बंडानंतरच्या पहिल्याच निवडणुकीत शिंदे गटाची चमकदार कामगिरी....

Eknath Shinde यांच्यासोबत गेलेल्या बंडखोर आमदारांना आपापली गावे राखण्यात यश
Eknath Shinde Latest Marathi News, Shiv Sena Latest News
Eknath Shinde Latest Marathi News, Shiv Sena Latest NewsSarkarnama

मुंबई : पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालच्या सत्तेला सुरुंगा लावल्यानंतर जेमतेम ४० दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राज्यातील ४० ग्रामपंचायतीवर आपल्या गटाचा झेंडा रोवला आहे. बंडखोर आमदारांना त्यांच्या तालुक्यात अपयश आले असते तर शिंदे गटावर मोठी टीका झाली असती. मात्र उलट घवघवीत यश मिळाल्याने त्यांचा विश्वास दुणावला आहे.

आपल्या समर्थकांना या निवडणुकीसाठीची रणनीती शिंदे यांनी आपल्या 'नंदनवना'तून म्हणजे, त्यांच्या निवासस्थानातूनच ठरवून दिली. या निकालात ठाकरेंवर मात करण्याची संधी मिळाल्याने शिंदे गटात शुक्रवारी रात्री खास 'सेलिब्रेशन' ही झाले. शिंदे गटाने ४० ग्रामपंचायती जिंकल्या तर शिवसेनेने मात्र २७ ठिकाणी विजय मिळवला.

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या काही मतदारसंघातही ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. तिथे त्यांनी आपले वर्चस्व कायम राहिले आहे. बंडानंतर लोक धडा शिकवतील, या शिवसेनेच्या इशाऱ्यानंतर आमदारांनी या निवडणुका गांभीर्याने घेतल्या होत्या. त्यामुळे अशा ग्रामपंचायतींच्या निकालाकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. काही ग्रामपंचायतींमध्ये शिवसेनेलाही जागा मिळाल्या नाहीत. मात्र, बंडखोर आमदारांचे पारड जड असल्याचे निकालावरून दिसले. परिणामी, शिंदे गटाचा उत्साह वाढला असून, आगामी निवडणुकांत ताकदीने उतरण्याची तयारी हा गट करणार असल्याचे स्पष्ट आहे.

राज्यातील ऐन सत्तासंघर्षात झालेल्या २३८ ग्रामपंचायतींसाठीच्या लढतीत ८२ ठिकाणी विजयी मिळवून अव्वल ठरल्याचा दावा सत्ताधारी भारतीय जनता पक्ष करीत आहे. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसकडे ५३ ग्रामपंचायती आल्याचे सांगण्यात येत आहे. तर बंडानंतरच्या दीड महिन्यांतच शिवसेनेच्या बंडखोर अर्थात, शिंदे गट ४० ठिकाणी जिंकल्याचा निकाल आहे. पडझडीत शिवसेनेला २७ आणि काँग्रेसकडे २२ ग्रामपंचायती राहिल्या आहेत. नव्या राजकीय घडामोडीत शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी आपापल्या मतदारसंघातील ग्रामपंचायती जिंकल्याचे दिसून येत आहे. स्थानिक आघाड्यांना ४७ ठिकाणी यश आल्याचा दावा आहे.

राजकीय उलथापालथीनंतर राज्यातील १५ जिल्ह्यांत २७१ पैकी ३३ ग्रामपंचायतीन निबविरोध झाल्या होत्या. उर्वरित २३८ ग्रामपंचायतींसाठी गुरुवारी मतदान झाले. त्याचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. राज्यात सत्तांतर होऊन नवी समीकरणे जुळून आल्याने निवडणुकांच्या निकालाची उत्सुकता होती. या निवडणुका जिंकून आपली ताकद दाखविण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली होती. तर काही भागांत प्रस्थापितांना रोखण्यासाठी पक्षीय मतभेद बाजुला सारून नव्या विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी स्थानिक पातळीवर आघाडी केल्या होत्या.

शिवसेना-शिंदे गटातील वादामुळे या काही ग्रामपंचायतींसाठी चुरस पाहायला मिळाली. राज्याच्या सत्तेतून पायउतार झालेल्या दोन्ही काँग्रेसने वरचढ ठरण्यासाठी तयारी केली होती. तर सत्तेत येताच भाजपनेही पुन्हा ताकद वाढविण्याची व्यूहरचना आखली होती. या निवडणुकीत पहिल्या क्रमांकावर असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी फारसी तयारी नसतानाही शिवसेना ( शिंदे गट)-भाजप युतीला चांगले यश मिळाले आहे. या निवडणुकीत कष्ट केल्याने हा निकाल लागला आहे. यापुढच्या काळात अधिक जोमाने सर्व निवडणुकांना सामोरे जाऊ.

-एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com