पुस्तकांचे गाव भिलारला मिळणार बळ...

 पुस्तकांचे गाव भिलारला मिळणार बळ...

भिलार (महाबळेश्‍वर) : विविध क्षेत्रात होणारा मराठीचा वापर गुणवत्तापूर्ण व्हावा, यासाठी निर्माण केलेल्या राज्य मराठी विकास संस्थेला तब्बल दहा वर्षांनी पूर्णवेळ संचालक मिळाला आहे. संजय कृष्णाजी पाटील यांच्याकडे हा पदभार प्रतिनियुक्तीने सोपविल्याने पुस्तकांच्या गावाला आणखी बळ प्राप्त होणार आहे. 

काही मंत्रालयीन कर्मचाऱ्यांच्या उदासिनतेमुळे या गावावर आलेले अनिश्‍चितीचे सावट दूर होण्यास मदत होणार आहे.

राज्य मराठी विकास संस्थेचे संचालकपद 13 मार्च 2010 पासून रिक्त होते. या पदावर प्रभारी म्हणून नेमणुका होत होत्या. राज्य मराठी विकास संस्थेने दोन वर्षांपूर्वी तत्कालीन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या संकल्पनेतून भिलार (ता. महाबळेश्‍वर) हे पुस्तकांचे गाव बनवले. बदलत्या राजकीय परिस्थितीचा फायदा घेत या विभागातील काही मंत्रालयीन कर्मचाऱ्यांनी या पुस्तकांच्या गावाला खो घालण्याचे प्रयत्न सुरू केले.

 येथील कर्मचाऱ्यांना पगार दिला नाही. काहींना घरी पाठवण्याच्या हालचाली सुरू केल्या. त्यामुळे भिलार ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त करून मंत्री एकनाथ शिंदे व सुभाष देसाई यांच्याशी संपर्क साधला. "सकाळ'नेही वस्तुस्थिती मांडली.

या सर्व पार्श्‍वभूमीवर हालचाली घडून अखेर श्री. पाटील यांच्याकडे दोन वर्षांसाठी विशेष बाब म्हणून हा पदभार सोपवण्यात आल्याचे मराठी भाषा विभागाने शासन निर्णयाद्वारे स्पष्ट केले. श्री. पाटील यांनी पदभार स्वीकारला असून राज्य मराठी विकास संस्थेच्या घटनेनुसार ही संस्था ज्या उद्दिष्टांसाठी निर्माण झाली, ती गाठण्याचे ध्येय नजरेसमोर असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. प्रा. आनंद काटीकर यांच्यानंतर साहित्य संस्कृती मंडळाच्या सचिव मीनाक्षी पाटील यांच्याकडे हा पदभार होता. ही धुरा आता संजय पाटील सांभाळतील. वसुंधरा पेंडसे-नाईक यांच्यानंतर संस्थेच्या संचालकपदी पूर्णवेळ संचालकाची नियुक्ती झाली नव्हती.

पुस्तकांचं गाव बंद होणार या वावड्या उठत असताना आता मात्र हा प्रकल्प ग्रामपंचायतीकडे वर्ग होणार असल्याच्या बातम्यांबाबत श्री. पाटील म्हणाले, "ज्या गोष्टींचा निर्णय अथवा शक्‍यताच नाही, त्याबाबत चर्चा करणे अथवा बोलणेही उचित नाही.'

""पुस्तकांचं गाव बंद होणार, पुस्तकांचं गाव ग्रामपंचायतीकडे वर्ग करणार, या सर्व अफवा असून मंत्रालयीन पातळीवरील निर्णय उपमुख्यमंत्र्यांना माहित नसेल का? आम्ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांना या विषयाबाबत भेटलेलो असून या विषयात काहीही तथ्य नाही. त्यामुळे आता या विषयावरील चर्चा थांबवावी.''
-बाळासाहेब भिलारे ( ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी कॉंग्रेस)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com