औरंगाबादः मुंबई मार्केट कमिटीच्या संचालकपदी पुन्हा विराजमान होण्याचा बहुमान मला विलासराव देशमुख साहेबांमुळे मिळाला. पक्षातील माझे काम आणि सक्रीयता पाहून ' जितेंद्र मी तुला पुन्हा संधी देणार' अशा शब्द त्यांनी मला दिला होता. एकवेळ आपली संधी हुकली असे चित्र समोर दिसत होते, त्यावेळच्या पणन मंत्र्यांकडून तसे संकेत मिळाले होते. पण विलासरावांनी दिलेला शब्द पाळला आणि मी दुसऱ्यांदा मार्केट कमिटीचा संचालक झालो, अशी आठवण कॉंग्रेसचे अनुसूचित जाती विभागाचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष जितेंद्र देहाडे यांनी सरकारनामाशी बोलतांना सांगितली.
विलासरावांनी मला वडिलांच्या निधनानंतर वयाच्या 25 व्या वर्षी मुंबई मार्केट कमिटीचा संचालक केलं आणि माझ्या खऱ्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. प्रदेश युवकचा सरचिटणीस, डॉ.बाबाहसाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विद्या परिषदेचा सदस्य अशा अनेक महत्त्वाच्या पदावर काम करता आले. मुंबई मार्केट कमिटीच्या संचालक पदाची पहिली टर्म संपली होती. दुसऱ्या टर्मसाठी नावे देण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. मला या पदावर आणखी काम करण्याची इच्छा होती.
यावेळी संचालक पदासाठी जवळपास 250 लोकांनी अर्ज केले होते. मी विलासराव देशमुख साहेबांची भेट घेतली आणि पुन्हा काम करण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा "मी माहिती घेतलीय, तुम्ही चांगले काम केलयं, व पक्षामधे सुद्धा सक्रिय आहात, तुम्हांला मी दुसऱ्यांदा संधी देतोय'' असा शब्द साहेबांनी मला दिला. आपल्या कामाचे चीज झाले हे पाहून मला भरून आले. मी साहेबांचे आभार मानून तिथून निघालो.
संचालकपदाची निवड प्रक्रिया सुरु होती, त्यावेळी पणन मंत्री हर्षवर्धन पाटील होते. खात्याचा प्रमुख म्हणून नियुकत्या करण्याचे अधिकार त्यांनाच होते. त्यामुळे त्यांचीही भेट घेण्याचे मी ठरवले. तोपर्यंत विलासराव देशमुख साहेबांनी माझ्याबद्दल त्यांना सांगितले होते , हे त्यांच्या बोलण्यातून जाणवले. "तुमचे नाव पाठवले आहे, परंतू आघाडी असल्यामुळे ती जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसने मागितली आहे, तर बघू कसे होतय' अस ते म्हणाले. जिल्हाधिकाऱ्यांकडे नावे पाठवण्याचा तो शेवटचा दिवस होता, आता आपली संधी जाणार असा विचार करत मी त्यांच्या बंगल्या बाहेर उभा होतो. रात्रीचे दहा वाजले होते, काय करावे मला काही सुचेनासे झाले.
माझे मन मला सांगत होते की हे सर्व मी साहेबांना सांगितले पाहिजे. परंतू रात्र झाली होती मी साहेबांना इतक्या रात्री कसा फोन करू हा प्रश्न मला सतावत होता. पण फोन केला नाही तर पुन्हा संधी मिळणार नाही हे स्पष्ट होते. थोडी हिंमत केली आणि साहेबांना फोन केला. दुसरी बेल वाजत नाही तोच साहेबांनी फोन उचलला देखील. मी घडलेला प्रकार त्यांना सांगितला, त्यावर काळजी करू नका व शांत झोपा एवढे बोलून त्यांनी फोन ठेवून दिला. रात्री हॉटेलवर गेलो पण चिंतेमुळे काही झोप लागली नाही.
दुसऱ्या दिवशी सकाळी मला मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयातून फोन आला आणि माझी मुंबई मार्केट कमिटीच्या संचालकपदी निवड झाल्याची सुखद बातमी आली. विलासरावांनी आपला शब्द पाळला होता, साहेबांना भेटून आभार मानले व साहेबांनी देखील पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. शब्दांना जागणारे विलासराव आज आपल्यात नाहीत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.