औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडी भटके विमुक्त आदिवासी समन्वय समितीच्या वतीने १३ मार्चला सीएए व एनआरसीविरोधात नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद येथे आदिवासी भटक्या विमुक्तांची परिषद होणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे व भटके विमुक्त आदिवासी समन्वय समितीचे राज्य समन्वयक प्रा. किसन चव्हाण यांनी येथे शनिवारी (ता.२९) पत्रकात परिषदेत ही माहिती दिली.
यावेळी प्रा. विष्णू जाधव, वंचित बहुजन आघाडीचे व भटके विमुक्त आदिवासी समन्वय समितीचे सदस्य अरुण जाधव, दिनेश साळवे, भरत दाभाडे, अशोक जाधव, श्रीरंग ससाणे, योगेश बन, प्रभाकर बखले, नितीन सोनवणे, गौतम गणराज यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रा. चव्हाण म्हणाले, ‘‘संघप्रणित केंद्रातील भाजप सरकारने बहुमताच्या जोरावर संविधानविरोधी हा कायदा आणला. सुरवातीला वरकरणी मुस्लिमविरोधी वाटणाऱ्या एनआरसी व सीएए कायद्यामुळे मुस्लिमांसह ४० टक्के आदिवासी, भटके विमुक्त, ओबीसी, दलित, हिंदू उद्ध्वस्त होणार आहेत. ज्या आदिवासींनी देशाला स्वातंत्र्य मिळावे यासाठी लढा दिला त्यांनाच आता या देशाचे नागरिक असल्याचा पुरावा या कायद्याने मागितला जाणार आहे. आदिवासी, भटक्या, विमुक्त तर गावगाड्यापासून दूर राहणारे, जन्म एका गावात, पाचवी दुसऱ्या गावात तर मृत्यू तिसऱ्या गावात यांच्याकडे कुठून येणार १९५१ पूर्वीचे जन्माचे अन् महसुली पुरावे,’’ असा सवालही त्यांनी केला.
देशातल्या संविधानानेच आदिवासी, भटक्या विमुक्तांना जन्मापूर्वीच देशाचे नागरिकत्व दिले आहे, यासाठी हा संविधानविरोधी कायदा रद्द करावा, कायद्याला तीव्र विरोध करण्यासाठी जनजागृती करण्यासाठी आदिवासी, भटक्या, विमुक्तांसाठी काम करणाऱ्या संस्था, कार्यकर्ते यांची परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेनंतर पुढच्या टप्प्यात गाव, वाड्या-वस्त्या, तांडे, पाड्यांवर जाऊन हे कार्यकर्ते जनजागृती करणार असल्याचे प्रा. चव्हाण यांनी सांगितले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.