स्वातंत्र्यवीर सावरकरांना "भारतरत्न' मिळालाच पाहिजे!

स्वातंत्र्यवीर सावरकरांना  "भारतरत्न' मिळालाच पाहिजे!

ठाणे : सावरकरांसारखे महान रत्न या देशात होऊन गेले, हे जगाला दाखवून देण्यासाठी सावरकरांना "भारतरत्न' मिळालाच पाहिजे. देशासाठी सर्वस्व उधळून टाकणाऱ्या या क्रांतीकारकाला भारतरत्नाची कोणतीही आवश्‍यकता नाही, त्यांना त्याचा उपयोगही होणार नाही. परंतु माझ्या देशाची ओळख सावकरकर आहे. हे जगाला कळण्यासाठी त्यांना भारतरत्न देण्याची गरज आहे. सरकार आपलेच असताना आता कोणाच्याही पावतीची गरज उरलेली नाही. सगळ्यांनी पक्ष आणि प्रांतभेद विसरून दिल्लीमध्ये जाऊन ही मागणी आग्रहाने मांडण्याची गरज आहे. देशासाठी त्यांनी मरणयातना भोगल्या होत्या. त्यामुळे सगळ्यांनी एकत्र येऊन ही मागणी करूया, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाण्यात केले. 

स्वा. सावरकर साहित्य अभ्यास मंडळ, मुंबई, स्वा. वि. दा. सावरकर प्रतिष्ठान, ठाणे आणि सावरकर दर्शन प्रतिष्ठान मुंबई या संस्थांच्यावतीने आयोजित 29 वे "अखिल भारतीय साहित्य संमेलना'चा समारोप रविवारी सायंकाळी गडकरी रंगायतनमध्ये झाला. शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे, शिक्षण, सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, पालकमंत्री एकनाथ शिंदे, संमेलनाध्यक्ष रमेश पतंगे, महापौर मिनाक्षी शिंदे आणि शहरातील खासदार आणि आमदार उपस्थित होते. समारोप प्रसंगी उध्दव ठाकरे यांनी सावरकरांना भारतरत्न देण्याच्या मागणीचा आग्रह धरून सगळ्यांना एकत्र येण्याचे आवाहन केले. हिंदूत्वाचे सामर्थ्य आपण विसरून जात असल्यामुळे ओवेसीसारखी मंडळी 15 मिनीटामध्ये हिंदूंचा खातमा करण्याची भाषा करतात. देश आपला वाटतच नसल्यामुळे ओवेसी सारख्यांची विरूध्द बोलण्याची हिमंत होते, असे ठाकरे म्हणाले. 

सावरकरांनी मांडलेल्या अखंड हिंदूस्तानचे स्वप्न आपल्याकडून पुर्ण होण्यासाठी हा देश माझा आहे, असे अभिमानाने म्हणण्याची गरज आहे. आजही कश्‍मिरमध्ये हल्ले होत आहेत. अरूणाचलमध्ये चीनने आपल्या गावांची नावे त्यांच्या पध्दतीने जाहिर करून टाकली आहे. आपण या गोष्टींचा फक्त निषेध करत बसलो आहोत. याशिवाय आपण काहीच करू शकत नाही. आपल्या इथला निषेध चीनला देखील ऐकू जाणार नाही. त्यासाठी सावरकरांसारख्या देशभक्तीची गरज देशाला आहे. सावरकरांनी जास्तीत जास्त हिंदूनी सैन्यामध्ये जाण्याचे आवाहन केले होते. साहित्य संमेलनामध्ये सावरकरांनी साहित्यिकांना लेखण्या मोडा आणि हातात बंदुका घ्या, असे म्हटले होते. हा त्यांचा आदर्श घेण्याची गरज आहे, असे ठाकरे म्हणाले. 

विचार पोहचवणारी रचना तयार करू 
सावरकरांच्या जीवनाची प्रेरणा तरूणांपर्यंत पोहचण्यासाठी सावरकरांच्या जीवनावरील "माझी जन्मठेप' हे पुस्तक या राज्यातील प्रत्येक तरूणांनी वाचले पाहिजे. सावरकरांचे जीवन प्रभावीपणे तरूणांपर्यंत पोहचवण्यासाठी रचनात्मक तयारी करण्याची आवश्‍यकता आहे. इतिहासामधून सनावळ्या विचारण्यापेक्षा देशभक्तीचे संस्कार देण्याची गरज आहे. त्यासाठी सावरकरांचे विचार आजच्या तरूणपीढीपर्यंत पोहचवण्यासाठी आवश्‍यक रचना तयार करण्याचा प्रयत्न राज्य शासनाच्या माध्यमातून करण्याचा विश्वास विनोद तावडे यांनी यावेळी व्यक्त केला.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com