सावरकर वादावर अजित पवार म्हणाले, `उद्धवजी, सोनियाजी आणि पवार साहेब मार्ग काढतील'

कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे कॉंग्रेस आणि शिवसेनेत तणावाचे वातावरण तयार झाले आहे. या वादाचा परिणाम राज्यातील महाविकास आघाडीवर होणार काय, या प्रश्नावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी `उद्धवजी, सोनियाजी आणि पवार साहेब मार्ग काढतील' अशी प्रतिक्रिया दिली आहे.
सावरकर वादावर अजित पवार म्हणाले, `उद्धवजी, सोनियाजी आणि पवार साहेब मार्ग काढतील'

पुणे - कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे कॉंग्रेस आणि शिवसेनेत तणावाचे वातावरण तयार झाले आहे. या वादाचा परिणाम राज्यातील महाविकास आघाडीवर होणार काय, या प्रश्नावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी `उद्धवजी, सोनियाजी आणि पवार साहेब मार्ग काढतील' अशी प्रतिक्रिया दिली आहे. 

झारखंडमधील एका सभेत बोलताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना मेड इन इंडिया योजना रेप इन इंडिया झाल्याचे म्हटले होते. त्यावर भाजपच्या खासदारांनी लोकसभेत गोंधळ घालत माफी मागण्याची मागणी केली. भाजपच्या गोंधळानंतर राहुल गांधींनी एक व्हिडिओ ट्विट केला. त्यात नरेंद्र मोदींनी दिल्लीचा उल्लेख बलात्काराची राजधानी असा केला आहे. त्यामुळे मोदींनीच माफी मागवी, असा पलटवार केला. त्यामुळे कॉंग्रेस आणि भाजपमधील हे युद्ध जोरदार सुरू झाले. 

आक्रमकतेचा पुढचा टप्पा भाजप सरकारच्या विरोधात कॉंग्रेसने काल नवी दिल्लीत केलेल्या आंदोलनात गाठला. त्यात कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींसह राहुल गांधी यांचे भाषण झाले. राहुल गांधी यांनी माफी मागण्यास स्पष्टपणे नकार देताना `मी राहुल सावरकर नाही; राहुल गांधी आहे' असे म्हटले. त्यामुळे तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. भाजपने आक्रमक होत राहुल गांधींना धारेवर धरले. 

महाराष्ट्रात शिवसेनेने राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसबरोबर महाविकास आघाडी स्थापन करून सरकार बनवले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या भूमिकेकडे साऱ्यांचे लक्ष होते. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी `तडजोड नाही' असे ट्विट करीत पक्षाची भूमिका मांडली. मात्र, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर `मवाळ' झाल्याची टीका केली.

त्या पार्श्वभूमीवर एएनआयने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांना सावरकर वादावर बोलते करण्याचा प्रयत्न केला. सावरकर वादाचा महाराष्ट्रातील महाविकास आघाडीवर काय परिणाम होईल का असे विचारले असता अजित पवार म्हणाले, ``उद्धवजी, सोनियाजी आणि पवार साहेब प्रगल्भ नेते आहेत. ते योग्य मार्ग काढतील.''

त्यामुळे राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार कसा मार्ग काढतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com