रिमोट कंट्रोल बाजूला ठेवीत उद्धवजींनी घेतला डायरेक्ट कंट्रोल

त्यामुळे यापुढे मातोश्रीवरून रिमोट न चालवता ते राज्य कारभारात स्वतः लक्ष घालून निर्णय घेताना दिसतील .
Sena_chief_Uddhav_Thakare
Sena_chief_Uddhav_Thakare

मुंबई :ठाकरे घराण्याच्या रिमोट कंट्रोलची परंपरा दूर सारत शिवसेनेचे कार्यप्रमुख उदधव ठाकरे यांनी डायरेक्ट कंट्रोल हात घेतला आहे . ते  आज सायंकाळी  शिवतीर्थावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

त्यामुळे यापुढे मातोश्रीवरून रिमोट न चालवता ते राज्य कारभारात स्वतः लक्ष घालून निर्णय घेताना दिसतील .  आदित्य ठाकरे यांना आमदारकीच्या निवडणुकीला उभे करून त्यांनी काळानुसार ठाकरे घराणे आणि शिवसेना बदलत असल्याचे संकेत दिले होते . आता परिस्थितीचा रेटा निर्माण झाल्यावर त्यांनी थेट मुख्यमंत्री पदाची जबाबदारी देखील साव्हाण म्हणून स्वीकारली आहे .

उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची आणि शिवसैनिकांची प्रतिमा बदलण्याचे काम गेल्या दहा वर्षात केले आहे .   उद्धव ठाकरे अत्यंत संयत स्वभावाचे आणि मितभाषी नेते आहेत .  उदधवजी वडिलांसारखी ठाकरी भाषा बोलत नसले तरी निर्णयांबाबत मात्र ते ठाम असतात. सेनेने मराठीपणाची वेस सोडायला हवी कारण लोकसंख्येतला टक्‍का बदलतोय हे लक्षात घेत मी मुंबईकरसारखा कार्यक्रम राबवणारे , शिवशक्‍ती भीमशक्‍ती एकत्र आणण्यासाठी पावले टाकणारे उदधवजी गेल्या पाच ते सहा वर्षापासून कमालीचे अस्वस्थ होते .

मोदी शहांच्या नेतृत्वातल्या भाजपच्या आक्रमकतेपुढे नमते न घेण्याचा निर्णय त्यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकांदरम्यान घेवून टाकला होता.पश्‍चिम बंगालमधल्या ममता बॅनर्जी , बिहारचे लालूप्रसाद यादव , दक्षिणेकडचे चंद्राबाबू, केसीआर,जगन रेडडी यांचे राजकारण त्या त्या प्रदेशात विजयी ठरते याकडे त्यांचे बारीक लक्ष होते.पश्‍चिम बंगालमधील तृणमूल कॉंग्रेसची बांधणी कशी आहे हे पहायला त्यांनी काही अभ्यासक वंगभूमीत पाठवले होते.

उत्तम फोटोग्राफर असल्याने प्रत्येक कोन तपासायचा,छायाचित्रात प्रत्येक तपशील परिपूर्ण कसा असेल याकडे लक्ष देणे हा उदधवजींचा स्वभाव. ओळखपरेडसाठी 162 आमदार जमा झाले तेंव्हा येथे वाइैड अँगल कॅमेरा हवा असे ते म्हणाले त्यामुळेच. वन्यजीवनात रस असल्याने प्राणीजीवन कसे असते,सावज कॅमेऱ्याच्या  फ्रेमच्या  टप्प्यात केंव्हा येते याकडेही ते लक्ष ठेवून असतात.

एकेकाळी राजकारणात अजिबात रस नसणारे बाळासाहेबांचे हे सर्वात धाकटे चिरंजीव सेनेत सक्रीय झाले ते वडिलांना मदत व्हावी या एकमेव कारणाने असे जाणकार सांगतात.1995 साली राज्यात स्थापन झालेल्या युती सरकारमधील अंतर्विरोध टोकाला गेले होते. कुटुंबातील अनेक गोष्टी बाळासाहेब ठाकरे  यांच्या मनासारख्या घडत नव्हत्या . तेंव्हा उदधव यांनी सक्रीय व्हावे अशी अपेक्षा स्वत: बाळासाहेबांनीच व्यक्‍त केली होती. त्यानुसार उद्धव पडद्यामागे शिवसेनेत युती सरकारच्या काळातच सक्रिय झाले होते .

तोवर सामना या दैनिकापर्यंत स्वत:ला मर्यादित ठेवणारे उदधव कालांतराने 2003 साली शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख झाले.त्यांच्या निवडीुचा ठराव राज यांना स्वत:च मांडावा लागला  होता.सेनेच्या संघटनात्मक बाबी त्यांनी हाती घेतल्या अन सुभाष तसेच अनिल देसाई ,मिलिंद नार्वेकर यांच्या मदतीने पक्षाला नवे वळण दयायला सुरूवात केली.

 राज यांच्या बंडानंतर मनसे तळपू लागली उद्धवजींनी शिवसेनच्या संघटनात्मक बांधणीवर आपली पकड बसवली .  राष्ट्रवादी कॉंग्रेस जशी कॉंग्रेसवर वरचढ झाली तसे मनसेला शिवसेनेवर वरचढ  होवू देणार नाही असे उदधवजी सांगत असत. तसे त्यांनी संघटनात्मक बांधणीच्या जोरावर आणि अचूक डावपेचांच्या जोरावर करूनही दाखवले .

भाजपबाबतही त्यांनी थेट तेच धोरण अवलंबण्याचा मार्ग स्वीकारला होता.2014 च्या विधानसभा निवडणुकीनंतर आमदार अस्वस्थ असल्याने ते सरकारमध्ये सामील झाले ते काहीशा नाराजीनेच. नंतर 2019 च्या लोकसभा निवडणुका स्वतंत्रपणे लढण्याची त्यांची इच्छा होती.मात्र तसे केल्यास जेमतेम 4 ते 5 जण निवडून येतील हे लक्षात आल्याने ते भाजपसमवेत राहिले.

विधानसभेतही जेथे शक्‍य होईल तेथे परस्परांना आव्हान देण्याचा मार्ग भाजपप्रमाणे त्यांनीही स्वीकारला.निकालांनी भाजपला 105 जागांवर मर्यादित ठेवले अन गणित बदलले. उदधवजींना त्यांच्याच शब्दांनुसार भाजपने नाकारले तर विरोधकांनी आपले मानले.

 मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या पहिल्या ठाकरेंना पत्नीने दिलेली साथही मोलाची आहे.राज यांची बहिण जयजयवंती यांची  रश्मीबहिणींशी मैत्री होती .   मग डोबिवली निवासी रश्‍मी पाटणकरांची ठाकरे कुटुंबात उठबस सुरू झाली. या मध्यमवर्गीय देखण्या घरंदाज चेहऱ्याची उदधवजींनी मग जीवनसाथी म्हणून निवड केली.

त्यांना उन्हापावसात साथ देणाऱ्या वहिनी आदित्य ,तेजस यांची आई ही भूमिका तर निभावतातच पण शेकडो शिवसैनिक त्यांच्याकडे मन मोकळे करतात.काही वर्षापूर्वी आजाराचा सामना करणाऱ्या उदधवजींना त्यांची खंबीर साथ होती . आता वर्षा या नव्या मुक्‍कामी  रश्मी ठाकरे या महाराष्ट्राच्या मिसेस मुख्यमंत्री या नव्या स्वरूपात दिसणार आहेत . उद्धव ठाकरेंना पत्नीची भक्‍कम साथ तीन पक्षांचे राजकारण हाकताना दिलासादायक ठरेल.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com