सरकारमधून बाहेर पडण्याबाबत उद्धव ठाकरेंचे मौन - निवडणूक आयोगावरच घसरले

सरकारमधून बाहेर पडण्याबाबत उद्धव ठाकरेंचे मौन - निवडणूक आयोगावरच घसरले

मुंबई : या पोटनिवडणुकीत जे घोळ समोर आले आहेत, ते पाहता निवडणुक यंत्रणेचा एकदाच सोक्षमोक्ष लावायची गरज निर्माण झाली आहे. तो लागला नाही तर पुढच्या निवडणुका लढवायच्या का याचा सर्व राजकीय पक्षांना एकत्र येऊन विचार करावा लागेल, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत केली. निवडणूक अधिकाऱ्यांना निलंबित करुन त्यांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही केली. शिवसेना सरकारमध्ये राहणार का, या प्रश्नावर मात्र ठाकरे यांनी मौन बाळगले. 

पालघरमध्ये शिवसेनेचे श्रीनिवास वनगा यांचा भाजपचे राजेंद्र गावित यांनी पराभव केला. त्यानंतर सायंकाळी ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली. या पत्रकार परिषदेत त्यांनी निवडणूक यंत्रणेवर कडाडून टीका केली. शिवसेना सरकारमध्ये आहे काय, असा प्रश्न विचारला गेल्यावर उद्धव ठाकरे काहीसे चिडले होते. मी फक्त लोकशाही वाचविण्यासाठी आज बोलतो आहे, असे सांगत त्यांनी हा प्रश्न टाळला. 

ते म्हणाले, "निवडणूक आयुक्तांचा निवडणूक प्रक्रियेवर ताबा आहे का हा प्रश्न उपस्थित होतो. ईव्हीएम मॅनेज होतात का हा एक मुद्दा आणि दुसरी मतदान प्रक्रिया. निवडणूक आयोग हे बुजगावणे आहे का? सर्व पक्षांनी मिळून निवडणूक आयुक्तांवर केस केली पाहिजे. निवडणूक आयुक्तांची नेमणूक न होता निवडणूक झाली पाहिजे. निवडणूक अधिकाऱ्यांच्या सहीने जो पहिला आकडा जाहीर केला त्यात आकडेवारी दिली होती सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजताची. नंतर दुसरा आकडा जाहीर केला. तसा करता येत नाही. अचानक दुसऱ्या दिवशी सकाळी जे सांगितले ते धक्कादायक होते. साधारण लाखभर मते वाढली होती. ही वाढलेली मते कोणती याची उत्तरे आम्हाला हवी आहेत," निवडणूक आयुक्तांची नेमणुकही निवडणुकीनेच व्हायला हवी, असे मतही उद्धव यांनी व्यक्त केले. 

मतदानाच्या दिवशी पैसे वाटप करताना काहींना पकडले होते. पण रितसर तक्रार नोंदली गेली नाही. आज विजयोत्सव साजरा करताना भाजपच्या उमेदवाराबाबत हे पकडलेले लोकच होते, असे सांगून उद्धव ठाकरे यांनी, तिथले निवडणूक अधिकारी होते तरी कोण? ही यंत्रणा तिथलेच होती. जर मुख्यमंत्र्यांकडून नेमणुका झाल्या असतील तर ते ऐकणार कुणाचे? क्रिकेट प्रमाणे अन्य देशांचे निरिक्षक बोलवायचे का? असे प्रश्न उपस्थित केले. लवकरात लवकर मतदान यंत्रणेचा सोक्षमोक्ष लावला जाणार नसेल, तर सर्व विरोधी पक्षांनी निवडणूक लढवायची का, याचा एकत्र येऊन विचार करायची वेळ आली आहे, असेही ठाकरे म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com