औरंगाबादः महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आले आहे, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन निवडणुकीपुर्वी दिले होते. एका वर्षात शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार नाही याची जाणीव आम्हालाही आहे. पण पाच वर्षात त्यांनी सातबारा कोरा करावा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. हे सरकार पाच वर्ष टिकावे अशी आपली इच्छा असून त्यांना माझ्या शुभेच्छा असल्याचेही ते म्हणाले.
औरंगाबाद येथे आयोजित तीनदिवसीय राष्ट्रीय अधिवेशनात प्रकाश आंबेडकर यांनी हजेरी लावत उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलतांना प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकार, एनसीआर, बेळगांव सीमा प्रश्नावर आपली मते मांडली.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, राज्यातील सरकार हे पाच वर्ष टिकावे अशी माझी इच्छा आहे, पण ते चालवण्याची जबाबदारी या तीन पक्षांची आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची मुंबईतील मोर्चाच्या पार्श्वभूमीवर भेट झाली तेव्हा एनआरसी संदर्भात सविस्तर चर्चा झाली.
या कायद्यामुळे फक्त मुस्लिमच बाधीत होणार असा त्यांचा समज होता. पण या कायद्याचा परिणाम केवळ मुस्लिमांवरच नाही तर देशातील चाळीस टक्के हिंदूवर देखील होणार आहे हे आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर एनआरसी महाराष्ट्रात आपण लागू करणार नाही असे उध्दव ठाकरे यांनी सांगितले.
बेळगाव भारतात आहे हे महत्वाचे..
एनआरसीच्या निमित्ताने महाराष्ट्र कर्नाटकातील बेळगांवचा प्रश्न आणि त्यातून केली जात असलेली वादग्रस्त विधान यासंदर्भात बोलतांना आपल्यासाठी सध्या बेळगांवचा प्रश्न महत्वाचा नसल्याचे प्रकाश आंबडेकरांनी सांगितले. बेळगाव महाराष्ट्रात असले काय? किंवा कर्नाटकात? ते भारतात आहे हे आमच्यासाठी महत्वाचे आहे.
मी जेव्हा बेळगाव भागाचा दौरा केला तेव्हा असे जाणवले की काहींच्या मते आम्ही आहो तिथेच ठिक आहोत अशी भूमिका होती. तर या भागातील बहुतांश मराठा लोकांनाच फक्त महाराष्ट्रात सामील व्हावे असे वाटते. यावर दोन्ही राज्यातील संघटना काय तो निर्णय घेतील, तुर्तास माझ्यासाठी हा महत्वाचा मुद्दा नाही असेही आंबेडकरांनी स्पष्ट केले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.