नगर : "भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास केंद्राने ताब्यात घेताना राज्याला विचारले नाही. या प्रकरणाचा तपास निःपक्षपातीपणाने व्हावा, अशीच इच्छा ज्येष्ठ नेते शरद पवार व आमची आहे. मात्र केंद्राने हक्क गाजविताना राज्याला या प्रकरणी राज्याला विश्वासात घेतले नाही,'' असा आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला.
मुंबई येथे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांची मुलाखत घेतली. या वेळी भीमा कोरेगाव प्रकरणाचा विषय चर्चिला गेला. याबाबत मत व्यक्त करताना ठाकरे म्हणाले, ''भीमा कोरेगावप्रकरणी घडू नये ते घडले. या वेळेला मात्र लोक शांततेत जमले व निघून गेले. या प्रकरणाच्या तपासकार्यात केंद्राचा अधिकार आहे. परंतु तो गाजविताना केंद्राने राज्याला विश्वासात घ्यायला हवे होते. तपास त्यांच्याकडे घेताना त्यांनी काहीतरी कारणे सांगायला हवी होते. याचा अर्थ राज्याच्या तपाशी यंत्रणेवर केंद्राचा विश्वास नाही का? असा प्रश्न निर्माण होतो. तसे असेल तर केंद्र व राज्य यांच्यातील संबंध हे विचित्र अवस्थेत जातात. केंद्राने जो झटपट निर्णय घेतला, त्याची गरज होती का, याचेच आश्चर्य वाटते.''
सरकार स्थापन झाल्यानंतर सरकारमध्ये महत्त्वाची भूमिका असलेले ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भीमा कोरेगावच्या तपासाबाबत एसआयटी स्थापन करावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर केंद्राने हा तपास त्यांच्या ताब्यात घेतल्या, याबाबत बोलताना ठाकरे म्हणाले, ''राज्याच्या पोलिसांवर केंद्राने अविश्वास दाखवू नये. केंद्राने राज्याकडे विचारायला हवे होते, की तुम्ही सरकार म्हणून तपासात काय केले. राज्याचे पोलिस कोणाचे गुलाम नाहीत. आम्ही राजकारणी आहोत. पवार साहेब बोलले असतील, मीही माझे मत व्यक्त करेल. ते बोलले म्हणजे त्यांनी त्यांचे मत व्यक्त केले. याबाबत आम्ही तात्काळ काही निर्णय घेतले का. तुम्हाला असे का वाटते, हे केंद्राने शरद पवारांना विचारायला हवे होते.''
कोणाला तरी वाचवायचा प्रयत्न होतो, असे पवार साहेबांचे मत आहे, असे आपणास वाटते का? या प्रश्नावर उत्तर देताना ठाकरे म्हणाले, ''मी अत्यंत निःपक्षपतीपणाने या प्रकरणाकडे पाहत आहे. या प्रकरणी भाजप, काँग्रेस यांचेही मत वेगळे असू शकते. आपल्या मताप्रमाणे कारभार चालविणे आणि एखाद्या घटनेचा तपास त्या दिशेने नेणे यात फरक आहे. पवार साहेब असे काही म्हणाले म्हणून त्यांना अमूक काही साधायचे होते, असे नाही. माझं पवार साहेबांशी बोलणे झाले होते. हा तपास निःपक्षपातीपणाने व्हावा, अशीही पवार साहेबांची इच्छा होती. माझीही तीच आहे.''
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.