प्रदेशाध्यक्ष : एक जिंकले, एक हरले 

आतापर्यंत चार मुख्यमंत्री दिलेल्या मराठवाड्याकडे या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रीय पातळीवरील दोन प्रमुख पक्षांची प्रदेशाध्यक्षपदे होती. त्या दोघांनीही लोकसभेसाठी आपले नशीब अजमावले, यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना मोठ्या मताधिक्‍याने विजय मिळाला. मात्र, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना पराभवास सामोरे जावे लागले.
प्रदेशाध्यक्ष : एक जिंकले, एक हरले 

औरंगाबाद : आतापर्यंत चार मुख्यमंत्री दिलेल्या मराठवाड्याकडे या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रीय पातळीवरील दोन प्रमुख पक्षांची प्रदेशाध्यक्षपदे होती. त्या दोघांनीही लोकसभेसाठी आपले नशीब अजमावले, यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना मोठ्या मताधिक्‍याने विजय मिळाला. मात्र, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना पराभवास सामोरे जावे लागले. 

कॉंग्रेसची सत्ता असताना पश्‍चिम महाराष्ट्रातील नेत्यांमध्ये मुख्मंत्रिपदासाठी रस्सीखेच होऊ लागली, की मराठवाड्याच्या वाट्याला मुख्यमंत्रिपद येते मानले जायचे. त्यातून शंकरराव चव्हाण, शिवाजीराव पाटील निलंगेकर, विलासराव देशमुख आणि अशोक चव्हाण या मराठवाड्यातील नेत्यांनी मुख्यमंत्रिपद सांभाळले. मागील २०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात भाजप-शिवसेनेची सत्ता आली आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. त्यांच्याकडील प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी भारतीय जनता पक्षाने २०१५ मध्ये खासदार रावसाहेब दानवे यांच्याकडे सोपविली. त्यासाठी त्यांना केंद्रातील मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला लावला. 

प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतरही त्यांनी त्यांच्या भाषणांचा ग्रामीण ढंग काही सोडला नाही. त्यामुळे अनेक वक्तव्यांमुळे त्यांना ट्रोल व्हावे लागले. शेतकऱ्यांविषयी केलेल्या वक्तव्यावरून आमदार बच्चू कडू यांनी त्यांच्याविरुद्ध मोहीमच उघडत जालना मतदारसंघात अनेक सभा घेतल्या. त्यांच्याविरुद्ध जालना मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची घोषणाही केली होती. शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचीही दानवे यांच्या जिल्ह्यातील कार्यशैलीवर नाराजी होती. 

त्यामुळे त्यांनीही भाजप-शिवसेना युती झाली नाही तर त्यांच्याविरुद्ध पक्षाकडून नाही तर अपक्ष लढण्याची तयारी केली होती. लोकसभेसाठी युती झाल्यानंतर खोतकरांना शांत करण्यात दानवे यशस्वी झाले. बच्चू कडू यांनीही उमेदवारी दाखल केली नाही. मात्र, प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात दानवे यांच्या मतदारसंघात दोन-तीन दिवस ठाण मांडून सभा घेतल्या. गेल्या पाच वर्षांत जालना जिल्ह्यात केलेल्या कामांमुळे त्यांना तीन लाखांवर आघाडी देत मतदारांनी गुलाल लावला. 

2014 च्या मोदी लाटेत नांदेडचा गड कायम ठेवणाऱ्या अशोक चव्हाण यांच्याकडे 2015 मध्ये कॉंग्रेसने प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवली. गेली चार वर्षे राज्य सरकारविरुद्ध सतत आवाज उठवला. राज्यभर संघर्षयात्राही काढली. मात्र, चव्हाण या वेळी लोकसभेची निवडणूक लढविण्यास इच्छुक नव्हते, तरीही पक्षाचा आदेश म्हणून त्यांनी ही निवडणूक लढवली. मात्र, त्यांना या वेळी पराभवाला सामोरे जावे लागले. 
कॉंग्रेससोबत बहुजन वंचित आघाडीला घेण्यात अपयश आले. त्या वंचित आघाडीने त्यांच्याविरुद्ध दिलेल्या उमेदवाराने घेतलेली सुमारे पावणेदोन लाख मतेच चव्हाण यांच्या पराभवास कारणीभूत ठरली असे म्हणावे लागेल.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com