भिवंडी : महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासाठी राज्यात मोठ्या घडामोडी दररोज घडत आहेत. सत्ता स्थापनेसाठी समाजवादी पक्षाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी आणि भिवंडी पूर्व विधानसभेचे आमदार रईस शेख यांनी महाविकास आघाडीतील शिवसेनेला समर्थन दिले आहे.
या समर्थनाच्या निषेधार्थ भिवंडीतील सपा कार्यकर्त्यांनी अबू आझमी व आमदार रईस शेख यांचे सोमवारी (ता. 25) सायंकाळी 8 वाजता कल्याण रोड नवी वस्ती भागात पुतळे जाळून निषेधार्थ घोषणाबाजी केली.
या घटनेमुळे भिवंडीतील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पोलिसांना या बाबतीत उशिरा माहिती मिळाल्याने त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आता बंदोबस्त तैनात केला आहे. राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेनेला समाजवादी पक्षाने समर्थन दिल्याने भिवंडी शहरातील कल्याण रोड नवी वस्ती परिसरात समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख व आमदार अबू असीम आझमी यांच्या पुतळ्यास चपलाचे हार घालून त्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यास आग लावून निषेध केला. तसेच समाजवादी पार्टी मुर्दाबादच्या घोषणादेखील दिल्या.
आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार मतदान मागताना समाजवादीच्या आमदाराने भाजप-शिवसेनेला सत्तेपासून रोखण्यासाठी मुस्लिम मतदारांची मते घेतली; मात्र आता समाजवादी पक्षाचे दोन्ही आमदार शिवसेनेसोबत गेल्याने या आमदारांनी मतदारांची फसवणूक केली आहे, असा आऱोप करण्यात आला आहे.
राज्यात आता फडणवीस सरकारला 30 तारखेपर्यंत बहमत सिद्ध करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. त्यानंतर शिवसेनेच्या नेतृत्त्वाखालील सरकार अस्तित्त्वात येणार की नाही, हे ठरणार आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.