दोन लाख रुग्ण होणार होते...पण 60 हजारावर रोखले : ठाकरे आणि फडणवीस यांच्यात मतभेद

आपली लढाई कोरोनाशी आहे, आकडेवारीशी नाही, असे सांगत सरकारने लपवालपवी करू नये, असे आवाहन फडणवीस यांनीकेले आहे.
devendra-uddhav
devendra-uddhav

पुणे : राज्यातील कोरोना संकटाची स्थिती आटोक्यात आहे की नाही यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात दावे-प्रतिदावे केले जात आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात ठेवल्याचा दावा सरकारने केला आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दोन लाखांपर्यंत जाईल, असा इशारा `आयसीएमआर`ने दिला होता. प्रत्यक्षात साठ हजार रुग्ण राज्यात आढळले आहेत, असा दावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याला दिलेल्या संदेशात केलेला होता.

ठाकरे यांचा हा दावा माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी सांगितले की आयसीएमआर आणि इंटर डिसिप्लनिरी टिमने सांगितलेल्या नियामांचे पालन झाले नाही. आयसीएमआरकडून कोरोनाच्या दोन लाख केसेस होणार असा दावा केला गेला होता. पण आता फक्त 60 हजार केसेस आहेत, असे राज्य सरकारकडून सांगितले जाते. मात्र, आसीएमआरकडून कोणतीही आकेडवारी सांगितली गेली नव्हती. कोरोना रुग्णांची संख्या तीव्रतेने वाढेल, असा इशारा देण्यात आला होता. पण राज्य सरकार आपलं अपयश लपवण्यासाठी नको ते स्पष्टीकरण देण्यात वेळ घालवत आहे, असा आरोप त्यांनी केला.

आयसीएमआरचा चुकीचा दाखला सरकारकडून देण्यात आला. आयसीएमआरने सुरुवातीला सीम्टोमॅटिक टेस्टिंग करा, असं सांगितलं होतं. त्यावेळी आम्ही असिम्टोमॅटिक टेस्टिंग केलं. ज्यावेळी कोरोना रुग्णांची संख्या वाढली आणि टेस्टिंग सुविधा देशभरात सुरु झाली. तेव्हा आयसीएमआरने असीम्टोमॅटिक टेस्टिंग करा, असं सांगितलं, आम्ही ते केलं नाही. आयसीएमआरने स्पष्टपणे सांगितलं की, जेवढे हायरिस्क कन्टॅक्ट आहेत, त्यांची टेस्टिंग करणे बंधनकारक आहे. मात्र, आम्ही आवश्यकता असल्यास करु, असा निर्णय घेतला, असेही फडणवीस यांनी सांगितले.

राज्यात 29 मे रोजी कोरोनाशी यशस्वी लढा देऊन बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येने उच्चांक गाठत एकाच दिवशी ८३८१ रुग्णांना घरी सोडण्यात आले. सरकारच्या या आकडेवारीवर फडणवीस यांनी आक्षेप घेतला असून ही बनवाबनवी असल्याची टीका केली आहे. 

आपली लढाई कोरोनाशी आहे, आकडेवारीशी नाही, असे सांगत सरकारने लपवालपवी करू नये, असे आवाहन केले आहे. लपवाछपवी करुन संकट थांबवता येत नाही, असा इशारा त्यांनी दिला. कोरोनातून बरा झाल्यानंतर घरी सोडण्यात आलेल्या पोलिसाचा चार तासांत मृत्यू झाल्याच्या बातमीचा दाखला देत फडणवीस यांनी ही टीका केली आहे. तसेच राज्य सरकार कमी पडत आहे. वरळी पॅटर्न वगैरे काही नाही. नीती आयोगाने राज्य सरकारचे कौतुक केलेले नाही, असा दावा त्यांनी केला.

राज्यात एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे होऊन घरी सोडण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यामुळे सरकारवर कौतुकाचा वर्षाव होत असताना फडणवीस यांनी हा आकड्यांचा खेळ असल्याची टीका वाहिन्यांशी बोलताना केली.

सरकारचे अस्तित्व कुठे आहे, असा सवाल करत आज संपूर्ण महाराष्ट्र हा अधिकारी चालवत आहेत. मात्र, अधिकाऱ्यांमध्ये कुठेही समन्वय नाही. राजकीय नेतृत्वाला अधिकाऱ्यांमधील समन्वय घडवावा लागतो. ते कुठेही होताना दिसत नाही. याशिवाय सोबतचे दोन पक्ष आहेत, ते फक्त हात झटकत आहेत, अशी टीका त्यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com