सिंधुदुर्ग : ''रिपब्लिकन टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यावर रायगड मध्ये जो गुन्हा दाखल झाला त्यात त्यांनी आत्महत्या करायला प्रवृत्त केले असा आरोप आहे. ही केस बंद झाली होती. त्यामुळे सुडाने व आकसाने उद्धव ठाकरे सरकारने जे उद्योग सुरु केले आहेत, त्यातलाच गोस्वामी यांना अटक करणे हा उद्योग आहे,'' असा आरोप माजी मुख्यमंत्री व विद्यमान खासदार नारायण राणे यांनी केला आहे.
रिपब्लिकन टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आज अटक करण्यात आली. इंटिरिअर डिझायनर अन्वय नाईक व त्यांची आई कुमुद नाईक यांच्या 2018 मध्ये झालेल्या मृत्युप्रकरणी रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आज महाराष्ट्र सीआयडीने त्यांच्या निवासस्थानातून ताब्यात घेतले. पोलिसांनी आपल्याला व आपल्या सासू-सासऱ्यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप गोस्वामी यांनी केला आहे. अटकेनंतर अर्णब यांना अलिबागला नेण्यात आले आहे.
याबाबत प्रतिक्रिया देताना नारायण राणे म्हणाले, ''सुशांतसिंह राजपूत, दिशा सालिआन यांच्या केसमध्ये या पत्रकाराने ठाकरे कुटुंबातल्या मंत्र्याचा संबंध जोडला, पुरावे दिले, याचा मुख्यमंत्र्यांना राग आला आहे. ते कुठल्याही थराला जाऊन कारवाई करतील. मुख्यमंत्र्यांना जनहिताची कामे, शेतकऱ्यांचे प्रश्न, कामगारांचे प्रश्न सोडवायला यांना वेळ नाही. ते अशा कामात गुंतलेले आहेत,''
दरम्यान, सत्ता आज आहे, उद्या नाही. आज तुमची सत्ता आहे, उद्या आमची असेल. फक्त इतकीच आठवण ठेवा असा इशारा भाजपचे आमदार नितीश राणे यांनी आज दिला आहे. राणे यांनी आज केलेले ट्विट हिंदीत होते. त्यांनी म्हटले आहे, की सत्ता आज आहे, उद्या नसेल, आज तुमची आहे. उद्या आमची असेल. फक्त इतकी आठवण ठेवा, की हिसाब तो होगा, इंटरेस्ट लगा के. हे ट्विट करताना मात्र त्यांनी कुठेही गोस्वामींचा उल्लेख केलेला नाही.
Edited By - Amit Golwalkar
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.