मी पंढरपुरात रोखतो, तुम्ही मंगळवेढ्यातून लीड द्या; आवताडे कसे आमदार होत नाहीत, तेच बघू

उपमुख्यमंत्री अजित पवारथेट धमकी देऊन गेले आहेत.
BJP MLA Prashant Paricharak's open challenge to NCP
BJP MLA Prashant Paricharak's open challenge to NCP

मंगळवेढा (जि. सोलापूर) : मी पंढरपुरात रोखतो, तुम्ही मंगळवेढ्यातून लीड द्या. मी आणि समाधान आवताडे यांनी अनेक बेरोजगारांना रोजगार दिला, त्यांनी 11 वर्षात काय केले? ही निवडणूक विचाराची आहे. भावनेची नाही. मी नाही तर माझ्या विचाराचा समाधान आवताडे आमदार झाला पाहिजे; म्हणून माझा प्रयत्न आहे. पंढरपूर मी सांभाळतो, तुम्ही मंगळवेढ्यातून मतदान द्या, समाधान आवताडे कसे आमदार होत नाहीत, हे बघूच, असे आव्हान आमदार प्रशांत परिचारक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला दिले. 

पंढरपूर पोटनिवडणुकीतील भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ पंढरपूरमध्ये आयोजित सभेत परिचारक बोलत होते. परिचारक यांनी आपल्या भाषणातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली. 

आमदार परिचारक म्हणाले की, मागील अकरा वर्षात विरोधकांनी तुम्हाला पाणी तर दिलेच नाही. फक्त सर्वे करण्याचे काम केले. पण, निधीची तरतूद केली नाही. आमच्या उमेदवारांस निवडून द्या; अन्यथा निधी मिळणार नाही, अशी थेट धमकी उपमुख्यमंत्री अजित पवार देऊन गेले आहेत. मात्र, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निधी देताना कधीही राजकारण केले नाही. मी आणि समाधान आवताडे यांनी अनेक बेरोजगारांना रोजगार दिला आहे, त्यांनी 11 वर्षात काय दिले आहे? ग्रामीण भागात जिथे टाकी आहे, तिथे पाईप नाहीत आणि जिथे पाईप आहेत, तिथे टाकी नाही, अशी वाईट परिस्थिती आहे. ही निवडणूक विचाराची आहे, भावनेची नाही. हे लक्ष असू द्या. 

भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या, महाविकास आघाडी सरकारमधील तीनही पक्ष हे 60 चा आकडाही पार करू शकले नाहीत, त्यांच्या जुगाडासाठी ते एकत्र आले आहेत. मी वीस वर्षे त्यांच्याबरोबर (राष्ट्रवादी काँग्रेस) राहिले आहे, त्यांचे खायचे दात व दाखवायचे दात वेगळे आहेत, हे मला माहिती आहे. 

आपण आज विजयी उमेदवारासाठी येथे जमलो आहोत. जनतेला लुटणाऱ्या लुटारूंनाच्या विरोधात, आया बहिणींची अब्रू लुटणाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या सरकाराच्या विरुद्ध ही निवडणूक आहे. सरकार मायबाप असल्याचे सांगितले जाते. मात्र, हे कसले मायबाप सरकार, हे तर लुटारूचे सरकार आहे. या राज्य सरकारच्या काळात महिला अत्याचार वाढले. या सरकारच्या विरोधात आम्ही रस्त्यावर उतरलो. आज जनता हवालदिल आहे, त्यांना दिलासा देण्याचे काम हे सरकार करू शकलेले नाही, असेही वाघ यांनी नमूद केले.

बार आणि रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर कोरोना वाढत नाही; परंतु मंदिरात गेल्यावर कोरोना वाढतो, हा जावईशोध या सरकारने लावला आहे. सत्तेची ऊब आलेले, माजखोर हे सरकार असून त्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी पंढरपूर-मंगळवेढ्याच्या विकासासाठी समाधान आवताडे हा दमदार आवाज सभागृहात पाठवा, असे आवाहन चित्रा वाघ यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com