बीड : राज्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू झाला आणि जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्यावर जिल्हा आपत्ती व्यवस्थान अधिकारी ही देखील जबाबदारी पडली. कोरोना लढ्याचा आदर्श पॅटर्न राबविणाऱ्या जिल्ह्याच्या टिमचे नेतृत्व करणाऱ्या राहूल रेखावार यांनी या कोरोनाच्या धामधुमीतही गेवराई तालुक्यातील अवैध वाळू उपशावर कारवाई केलीच.
बीडचे जिल्हाधिकारी म्हणून राहूल रेखावर रुजू झाले आणि त्यांनी सुरुवातीला प्रशासनाची साफसफाई करुनन १२ वी बोर्डाच्या परीक्षांचाही कॉपीमुक्तीचा पॅटर्न सुरु केला. अख्ख्या परीक्षा केंद्रांवर नियुक्त पर्यवेक्षकांसह महसूल व इतर विभागांच्या अधिकाऱ्यांचे बैठे पथक नेमले. परीक्षा केंद्र परिसरातील झेरॉक्स सेंटर बंदचे आदेश देत सुरु ठेवणाऱ्यांवरही प्रथमच थेट गुन्हे नोंदविले गेले. विशेष म्हणजे त्यांनीही परीक्षा केंद्रांना स्वत: भेटी दिल्या.
पण, परीक्षा संपण्याच्या आतच कोरोनाचा कहर निर्माण झाला. सर्वाधिक स्थलांतरीतांचा जिल्हा असलेल्या बीडला कोरोनाचा धोका अधिक होण्याचा संभव होता. परंतु, यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थानपाची जबाबदारी त्यांच्यावर आली. महसूल, ग्रामविकास, गृह व आरोग्य विभागाची योग्य सांगड घालून त्यांनी जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनांचा असा पॅटर्न उभारला की, अद्याप तरी कोरोना जिल्ह्याची वेस पार करुन शकलेला नाही.
कोरोनाच्या लढ्यात राहूल रेखावार यांचे सकाळी सुरु होणारे काम रात्री कधी ११ तर कधी १२ वाजेपर्यंतही संपत नाही. या वेळापर्यंतही अनेकदा ते कार्यालयात असतात. विशेष म्हणजे काम संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी कोण अधिकारी कोणती जबाबदारी पार पाडणार याच्या सुचनांचा सिलसिला ११ तर कधी १२ ला संपतो. विशेष म्हणजे अधिकारी आणि पत्रकारांच्या ग्रुपवरही ते एव्हर ॲक्टीव्ह असून सुचनांचे मेसेज देखील स्वलिखीत असतात हे विशेष.
कोरोना उपाय योजनांबाबत लहानात लहान घटकांच्या सुचनांची दखलही त्यांनी घेतली आणि प्रत्येकाला रिप्लाय आणि रिस्पॉन्सही दिला. म्हणूनच त्यांना प्रशासनातील सर्व घटकांसह जिल्ह्यातील सामान्यांची साथ मिळाली आणि जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनांचा आदर्श पॅटर्न निर्माण झाला. दरम्यान, कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनांबाबत भविष्यात उपचाराच्या नियोजनाचे काम करत असतानाच टंचाई, स्वस्त धान्याचे वितरण हे देखील महत्वाचे मुद्दे आहेत.
त्यांनी सुरुवातीलाच स्वत: एका गोदामावर जाऊन स्वत: स्वस्त धान्याची तपासणी केली. त्यामुळे काळाबाजार करणाऱ्यांचे धाबे दणाणले. तरीही काही फरक न पडलेल्या १७ स्वस्त धान्य दुकानांच्या परवान्यांचे आतापर्यंत निलंबनही झाले आहे. नेमक्या याच धामधुमीत प्रशासन व्यस्त असताना वाळू माफिये मात्र सक्रीय झाले.
तसे स्थानिक महसूल व पोलिस प्रशासनाचा या माफीयांना वरदहस्त लपून नाही. त्यामुळे योग्य तो मेसेज देण्यासाठी जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी गेवराई तालुक्यातील गुंतेगाव येथे स्वत: छापा टाकून गोदावरीतून उपसा केलेला अवैध वाळूसाठा नष्ट (नदीपात्रात पांगवून) केला.
दरम्यान, राहूल रेखावार यांनी आतापर्यंत स्थळपाहणी आणि तपासणी व कारवाईसाठी बाहेर पडल्यानंतर त्याची माहिती फक्त प्रशासनाच्या वहित केली परंतु त्याचा प्रपोगंडा मात्र होऊ दिला नाही. अद्याप त्यांच्या एकही पाहणीचे फोटो बाहेर आलेले नाहीत. ‘हंगामा खडा करना मेरा मक्सद नही मुझे सुरत बदलनी है’ या उक्तीनेच त्यांचे काम सुरु आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.