मुंबई : सिंधुदुर्गमधील चिप्पी परूळे विमानतळाच्या उद्घाटनावरुन चांगलेच राजकारण तापले आहे. या विमानतळाचे उद्घाटन येत्या ९ आक्टोबरला होणार आहे. त्यावरुन पुन्हा एकादा केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि शिवसेना (ShivSena) आमने-सामने आले आहेत. (Vinayak Raut criticizes Narayan Rane)
मंगळवारी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत विमानतळाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बोलवण्याची गरज नसल्याचे राणे यांनी म्हटले होते. त्यानंतर आज शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी राणेंना प्रतिउत्तर देत केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना फोन करुन उद्घाटनाची वेळ ठरवल्याचे सांगितले आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्र्यांनीच नारायण राणे यांना धक्का दिल्यीची चर्चा राजकीय वर्तुळात सुर झाली आहे.
यावेळी राऊत म्हणले, कालच उद्धव ठाकरे आणि ज्योतिरादित्य शिंदें यांच्यात सकाळी चर्चा झाली. यावेळी चिप्पी विमानतळाच्या उद्घाटनाचा दिवस ठरला. दोघांनी चर्चा करून दिवस ठरवला. ज्योतिरादित्य शिंदे यांच्याशी बोलणे झाल्यावर मुख्यमंत्र्यांनी मला 12 वाजता फोन करून सांगितले की, आम्ही 9 तारीख फिक्स केली आहे. मी त्यांना सांगितले तुमच्या सोयीनुसार तारीख ठरवा, असे विनायक राऊत यांनी सांगितले. तसेच मुख्यमंत्र्यांना बोलवायचे की नाही बोलवायचे याचा अधिकार राणेंना कुणी दिला?, राणे कोण लागून चालले? असा सवालही राऊत यांनी केला.
नारायण राणे काय म्हणाले होते?
ज्योतिरादित्य शिंदे हेच विमानतळाचे उद्घाटन करतील, असे सांगतानात शिवसेनेने कोकणामध्ये कोणताच प्रकल्प आणला नाही. त्यांनी आता श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये. त्यांचे कोणतेच खासदार कामाचे नाही. फक्त 'कलेक्शन मास्टर' आहेत. हा विमानतळ आम्ही तिथे आणला. त्याचे उद्घाटन नागरी विमान वाहतूक मंत्री हेच करतील. त्यांना (सेनेला) कुणी उद्घाटनाची परवानगी दिली आहे. विमानतळ हा केंद्राचा विषय आहे, असे राणे म्हणाले होते.
गेली सात वर्षे हा विमानतळ बांधून तयार होता, पण वाहतुकीला खुला नव्हता. आता कुठे सिंधूदुर्ग-मुंबई आणि ठिकाणी विमानसेवा सुरू होणार आहे, असे सांगताना २०१४ पर्यंत विमानतळ बांधून पूर्ण केला. अन्य कुणी विमानतळ बांधला नाही. आता कुणी श्रेय घेऊ नये, असा इशारा राणे यांनी दिला होता. मुख्यमंत्र्यांना या उद्धाटनाला बोलावणार का, या प्रश्नावर त्यांना बोलावयची गरज वाटत नाही, असेही राणे म्हणाले होते. कोकणात कोणता प्रकल्प त्यांनी पूर्ण केला? शिवसेना काही कामाची नाही. तिथे शिवसेनेने रोजगार आणला नाही, उद्योग धंदे बंद आहेत. काय त्यांनी आहे? शिवसेना सुरू करतच नाही, ते फक्त सगळे बंद करतात, अशी टीका त्यांनी केली होती.
आशिष शेलार काय म्हणाले?
राणेंच्या विधानाशी भाजप नेते असहमती दर्शविताना दिसत आहेत. भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्र्यांचा सन्मान झाला पाहिजे, अशी भूमिका मांडली. मी प्रोटोकॉल अधिकारी नाही, मात्र, महाराष्ट्राचा नागरिक म्हणून मला असे वाटते की भले शिवसेनेचा प्रयत्नामुळे चिप्पी विमानतळ झाले नसेल, भाजपच्या मुहूर्तमेढी मुळे झाले असेल तरी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा सन्मान झाला पाहिजे. असे शेलार म्हणाले होते.
Edited By - Amol Jaybhaye
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.