सातारा : राज्यात लवकरच लोकहिताचे उद्दीष्ट असलेले सरकार स्थापन होईल, असा आशावाद भारतीय जनता पक्षाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला. मात्र, माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या पक्षांतराबद्दल मात्र त्यांनी भाष्य करणे टाळले.
विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी आज (ता. 22 ऑक्टोबर) साताऱ्याच्या दौऱ्यावर असताना खासदार उदयनराजे भोसले यांची त्यांच्या जलमंदीर पॅलेस या निवासस्थानी भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी तासभर विविध विषयांवर चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना उदयनराजे यांनी वरील भाकीत केले.
उदयनराजे म्हणाले, "आपण सर्वसामान्य माणसांचा विचार केला पाहिजे. ज्यांनी आपल्याला मतदान केले, त्यांची आज ससेहोलपट होते आहे. सर्व दिशाहिन आहेत. सरकार कुणाचेही असो, स्थिर असले तर चांगला कारभार होऊ शकतो. वेगवेगळ्या विचाराचे लोक स्वार्थासाठी एकत्र येतात, त्यावेळी प्रत्येकाचे विचार वेगळे असल्याने एका निर्णयापर्यंत येणे अवघड असते. त्यावेळी आपापले हेतू साध्य झाल्यावर आपापल्या मार्गाने निघून जातात.
जेव्हा विचाराने लोक एकत्र येतात, तेव्हा एकत्र ठेवण्यासाठी ताकद लावावी लागत नाही. कारण त्यांचे उद्दीष्ट लोकहिताचे असते. हीच अपेक्षा महाराष्ट्रातल्या लोकांना आहे. मला खात्री आहे की लवकरच चांगले घडेल. लोकांचे प्रश्न मार्गी लागतील,'
या वेळी उदयनराजेंनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवीस यांना उद्देशून शुभेच्छाही दिल्या. केवळ राजकारणामुळे भाजपचे सरकार होऊ शकले नाही हे दुर्दैव आहे, अशी खंत त्यांनी या वेळी व्यक्त केली.
भाजप शिखर गाठत असताना त्या पक्षाचा पाया मात्र खचत चालला आहे, या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधानावर उदयनराजेंनी प्रतिक्रिया देणे टाळले. कुणाच्या प्रतिक्रियांवर भाष्य करायला मी मोकळा नाही, असे सांगत त्यांनी हा मुद्दाच उडवून लावला.
Edited By Vijay Dudhale
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.