महत्त्वाची बातमी : पूरग्रस्त शेतकऱ्यांना प्रतिहेक्‍टरी 10 हजार; तर फळबागांसाठी 25 हजार रुपये

ही मदत येत्या दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल.
uddhv-at-farm-ff
uddhv-at-farm-ff

मुंबई : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारने आज दहा हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या घोषणेनुसार प्रतिहेक्‍टरी दहा हजार रुपये, तर फळबागांसाठी हेक्‍टरी 25 हजार रुपये मदत दोन हेक्‍टरपर्यंत देण्यात येणार आहे. ही मदत येत्या दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल, असेही ठाकरे यांनी यावेळी सांगितले., 

नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्या नुकसानीची पाहणी करताना विविध नेत्यांनी राज्य सरकारने तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी केली होती. तसेच मुख्यमंत्र्यांकडे तशी मागणी शेतकऱ्यांनी दौऱ्यादरम्यान केली होती. तो रेटा ओळखून आज महाविकास आघाडी सरकारने एक बैठक घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी दहा हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. 

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्या उपमुख्यमंत्री अजित पवार हे व्हिडिओ कॉन्फरसद्वारे सहभागी झाले होते. या वेळी महसूल बाळासाहेब थोरात व इतर मंत्री सहभागी झाले होते. 

मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या पॅकेजनुसार जिरायती पिकासाठी प्रतिहेक्‍टरी दहा हजार रुपये, तर फळबागांसाठी 25 हजार रुपयांची मदत मिळणार आहे. ही मदत दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांना मिळणार आहेत. केंद्राच्या निकषानुसार 6800 रुपये मदत मिळते. परंतु त्यात आम्ही वाढ करत 10 हजार प्रतिहेक्‍टर या प्रमाणे दोन हेक्‍टरप्रमाणे मदत देण्यात येणार आहे, असे ठाकरे यांनी सांगितले. 

महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आले होते. तेव्हापासून एकामागोमाग संकटे येत आहेत. त्यातूनच आतापर्यंत आलेल्या नैसर्गिक आपत्तीवर 9800 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. कोकण निसर्ग चक्रीवादळ आले होते, त्यासाठी आम्ही केंद्राकडे 1065 कोटी रुपयांची मागणी केली होती, पण, केंद्राकडून अद्याप ती मदत मिळाली नाही. पूर्व विदर्भातील पूरग्रस्तांसाठी 800 कोटींची केंद्राकडे मागणी केलेले आहे. पण तीही रक्कम अजून केंद्राने दिलेली नाही. याशिवाय केंद्राकडून अजूनही 38000 कोटी रुपये हक्काचे येणे बाकी आहेत. त्यासाठी स्मरण पत्रे पाठवूनही ते अजून दिले नाहीत. 

केंद्राने अजूनही पथक पाठविले नाही 

दरम्यान, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्राला आठवण करूनही केंद्राने अजून पथक पाठवलेले नाही. संकटे कायम आहेत, कोरोनापाठोपाठ आता अतिवृष्टीचे मोठे संकट आले आहेत. त्यामुळे सध्या आर्थिक अडचण सुरू आहे, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.  

Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com