शिवराजसिंह चौहान अन् दिग्विजयसिंह यांच्यात जुंपली

मध्य प्रदेशमध्ये 28 विधानसभा मतदारसंघात आज पोटनिवडणुका झाल्या. या निवडणुकांत सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्ष असलेला काँग्रेस आमनेसामने आले आहेत.
shivraj singh chouhan slams digvijay singh over evm hacking claim
shivraj singh chouhan slams digvijay singh over evm hacking claim

भोपाळ : मध्य प्रदेशातील पोटनिवडणुकांत सत्ताधारी भाजप विरुद्ध काँग्रेस असा जोरदार सामना रंगला आहे. राज्यात आज 28 विधानसभा मतदारंसघात पोटनिवडणुका झाल्या. या पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा ईव्हीएम हॅक करण्याचा मुद्दा समोर आला आहे. आता यावरुन मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि काँग्रेस नेते दिग्विजयसिंह यांच्यात जुंपली आहे. 

मध्य प्रदेशात 28 विधानसभा मतदारसंघात आज पोटनिवडणुका झाल्या. या पोटनिवडणुकांचा निकाल 10 नोव्हेंबरला लागणार आहे. जोतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांच्यासोबत 22 आमदार काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले होते. त्यामुळे कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकार पडले होते. आज राज्यात एकूण 28 मतदारसंघात पोटनिवडणुका झाल्या आहेत. 

या पोटनिवडणुकांमुळे मध्य प्रदेशातील राजकीय वातावरण तापले होते. काँग्रेसचे सरकार पाडणाऱ्या भाजपला धडा शिकवण्यासाठी काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी कंबर कसली होती. राज्यातील भाजप नेत्यांना फोडून मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि ज्योतिरादित्य शिंदे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्नही कमलनाथ यांनी या निवडणुकीत केला होता.  

दिग्विजयसिंह यांनी ईव्हीएमबाबत प्रश्न उपस्थित करणारे ट्विट केले आहे. यावरुन मोठा गदारोळ सुरू आहे. दिग्विजयसिंह यांनी ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित करीत म्हटले होते की, तंत्रज्ञानाच्या युगात देश ईव्हीएमवर विश्वास ठेवू शकत नाही. केवळ भारत आणि इतर काही छोट्या देशांमध्ये ईव्हीएमवर मतदान होते. विकसित देश ईव्हीएमवर मतदान का घेत नाहीत? कारण त्यांचा ईव्हीएमवर भरवसा नाही. या मशिनमध्ये चिप असून, ती हॅक केली जाऊ शकते.  

याला मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी म्हटले आहे, की काँग्रेस आपला पराजय पुन्हा एकदा ईव्हीएमवर फोडण्याच्या तयारीत आहे. छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये 2018 मध्ये ज्यातून निकाल  आले, त्याच या ईव्हीएम आहे. मात्र, त्यावेळी त्या ठीक होत्या. आता पराजय समोर दिसू लागल्यानंतर काँग्रेसने ईव्हीएमला दोष देण्यास सुरूवात केली आहे. 

राज्यातील सत्ता कायम राखण्यासाठी भाजपला केवळ 9 जागा हव्या आहेत. काँग्रेसला पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी पोटनिवडणुकीतील सगळ्या जागा जिंकाव्या लागतील. यानंतर राजकीय समीकरणे बदलू शकतात. कमलनाथ यांच्यावर आता मोठी जबाबदारी येऊन पडली आहे. कारण काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेल्या 22 आमदारांना पराभूत करुन सत्त्तांतराचा वचपा त्यांना काढावा लागणार आहे. 

Edited by Sanjay Jadhav 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com