मुंबई : खासदार छत्रपती संभाजीराजे (Chatrapati Sambhajiraje) हे मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) निमित्ताने सध्या विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. त्यांच्या मनात काय आहे, हे अनेकांना अद्याप उमजलेले नाही. मात्र या भेटीगाठींवरून माजी मुख्यमंत्री आणि भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी ‘हे कसले राजे आहेत, असा सवाल करत टीका केली होती. त्यावरुन आता संभाजीराजेंनी राणे यांना उत्तर दिले आहे. (Sambhaji Raje criticizes MP Narayan Rane)
या संदर्भात संभाजीराजेंनी ट्वीट केले आहे. ते त्यामध्ये म्हणाले की ''छत्रपती घराण्यातील व्यक्तीचे काम पेटवणे नाही तर न्याय देणे आहे. आणि ताकदच पहायची असेल तर योग्य वेळी ती दाखवू. ताकद दाखविण्यासाठी लोकांचे जीव घेणे योग्य नाही, त्यापेक्षा लोकांचे जीव कसे सुरक्षित ठेवता येतील हे महत्त्वाचे आहे, कारण माझा वारसा शिवशाहूंच्या विचारांचा आहे,'' असे म्हणत संभाजीराजेंनी नारायण राणेंच्या टीकेला उत्तर दिले आहे.
काय म्हणाले होते नारायण राणे?
''रयतेने त्यांच्याकडे जायचे तर, हेच रयतेकडे जातात. त्यांच्या मागे किंवा आजूबाजूला कोणी नसते. समाजालाही ते राजे वाटत नाहीत. भाजपने स्वतःहून त्यांना खासदारकी दिली. परंतु, आता तिची मुदत संपत आल्यामुळे त्यांच्या आता ते अशा भेटीगाठी करीत आहेत,'' असे राणे म्हणाले होते. मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे हे शिवराज्यभिषेकदिनी रायगडावर आंदोलन करणार आहेत, असे त्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर राणे म्हणाले, ''रायगडावर आंदोलन करून काय उपयोग, तेथे कोण आहे. त्यांची दखल समाजही घेत नाही म्हणून रायगडावर जाण्याची त्यांच्यावर वेळ आली आहे.''
संभाजीराजेंच्या डोक्यात वेगळेच चालले आहे, अशा प्रकारची टीका राणे यांनीही केली होती. आमदार नितेश यांनीही संभाजीराजेंच्या सध्याच्या धोरणावर नाराजी व्यक्त करत टोले लगावले होते. नारायण राणे यांनीही त्याचीच पुनरावृत्ती पुण्यात केली. नारायण राणे यांनी शिवसेनेवरही सडकून टीका केली होती.
ते म्हणाले, ''शिवसेनेत मी ३९ वर्षे होतो. त्यामुळे आरक्षणाबाबत त्यांची भूमिका काय आहे, हे मला जास्त माहिती आहे. शिवसेनेने कधीही आरक्षणाला पाठिंबा दिला नव्हता. त्यामुळेच मराठा समाजालाही त्यांना आरक्षण द्यायचे नव्हते. त्यामुळेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरक्षणाबाबत निष्काळजीपणा दाखविला आणि महापापाचे धनी झाले. मुळात ठाकरे यांचा आरक्षणाचा अभ्यास नाही. चार चांगले वकील त्यांना नियुक्त करता आले नाही. मातुश्रीःच्या बाहेर न पडणाऱ्या व्यक्तीला काय कळणार ? त्यामुळे मराठा समाजाने लक्षात घ्यायला पाहिजे की, त्यांना आरक्षण न मिळण्यास उद्धव ठाकरे जबाबदार आहेत.'' असल्याचे सांगत त्यांनी टीका केली होती.
Edited By - Amol Jaybhaye
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.