पार्थच्या निमित्ताने आठवले शरद पवार यांचे टोले आणि टोमणे!

शरद पवार हे पुणे जिल्ह्यातील नेते असल्याने त्यांच्यात पुणेरीपणा भरपूर आहे. पुणेरी शैलीतील शालजोडीचे त्यांचेअनेक किस्से आजही चर्चेत असतात.नातू पार्थ पवार याच्याविषयी थेट टीका केल्यानंतर पवारांच्या गाजलेल्या काही वाक्यांची या निमित्ताने आठवण झाली.
Sharad Pawar-Parth Pawar
Sharad Pawar-Parth Pawar

पुणे : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे त्यांच्या शालजोडीतून टोमणे मारण्याच्या शैलीत सध्याच्या राजकीय नेत्यांत अव्वल आहेत. त्यांचा प्रत्येक शब्द हा तोलुनमापून असतो. त्यामागे विचार असतो आणि लक्ष्यही निर्धारित असते. त्यामुळे जो संदेश द्यायचा आहे, तो थेट जातोच.

शरद पवार यांनी फार कौतुक केले आणि किंवा ते फार चिडले या दोन्ही गोष्टी तशा धोकादायक समजल्या जातात. पवार हे बुधवारी आपल्या नातवाविषयी चिडून बोलले. नातू पार्थ पवार हा इमॅच्युअर असल्याचे सांगत त्याच्या शब्दाला कवडिचीही किंमत नसल्याचे त्यांनी जाहीरपणे सांगितले. पवार असे घरच्यांविषयी चिडून बोलल्याचे हे अलीकडच्या काळातील पहिलेच उदाहरण आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करून भाजपशी घरोबा केला तेव्हा देखील पवार इतके अजितदादांविषयी जाहीररित्या कडवटपणे बोलले नव्हते. हा कडवटपणा मात्र पार्थच्या बाबतीत दिसून आला,

राज ठाकरे यांची उडवलेली खिल्ली...

पार्थविषयीचा प्रश्न ते टोलवू शकत होते. तो प्रश्न आणि पार्थची भूमिका दुर्लक्षित करणे सहज शक्य होते किंवा वडिलकीचा सल्ला देत पार्थला योग्य तो संदेशही देऊ शकत होते. मात्र ते सारे टाळत `एक घाव दोन तुकडे`, असेच पवारांनी केले आहे. पवारांची या निमित्ताने अशी अनेक विधाने आठवली की ज्यामुळे त्यांनी प्रतिस्पर्ध्यांना घायाळ केले किंवा टोमणे मारून त्यांच्या पात्रतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राज ठाकरे यांना सुरवातीचा दिलेला सल्ला हा त्यांच्या या शैलीचा सर्वोत्तम नमुना आहे. राज ठाकरे यांनी मनसेची स्थापना 2006 मध्ये केली. त्यावेळी पवारांना मनसेची कामगिरी भविष्यात कशी राहील, असा आशयाचा प्रश्न विचारला होता. राज ठाकरे यांना त्यासाठी आधी लवकर उठायची सवय करून घ्यावी लागेल, असा सल्ला देत पवारांनी राज यांची खिल्लीच उडवली होती. 

उपहास हे अस्त्र

शरद पवार हे आॅन कॅमेरा सहसा कोणाविषयी चिडत नाहीत. ( 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या आधी पवारांचे अनेक नातेवाईक हे राष्ट्रवादी काॅंग्रेस सोडून भाजपमध्ये जात असल्याबद्दल विचारलेल्या प्रश्नावर पवार हे नगर जिल्ह्यात झालेल्या पत्रकार परिषदेत प्रचंड चिडले होते. हा अलीकडचा प्रसंग आहे.) पण ज्या प्रश्नाविषयी बोलायचे नाही त्यावर ते शक्यतो उपहासात्मक बोलतात. चंद्रकांत पाटील यांनी समजा त्यांच्यावर टीका केली आणि पवारांना उत्तर द्यायचे नाही तर ते पाटील हे महाराष्ट्रात प्रचंड जनाधार असलेले नेते आहेत. त्यांच्याविषयी मी काय बोलणार, असे उत्तर देऊन ते वेळ टाळतात. प्रदेश काॅंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा म्हणून काम पाहत असताना दिवंगत प्रभा राव या पवारांविषयी थोड्या टाकून बोलल्या होत्या. तेव्हा प्रचंड लोकप्रिय काॅंग्रेस अध्यक्षा, असा त्यांचा उल्लेख करून पवारांनी त्यांना दुर्लक्षित केले होते. विधानसभेचे अध्यक्ष असलेले नाना पटोले हे काही वर्षांपूर्वी भाजपचे खासदार होते. भाजपचा त्याग करण्यापूर्वी ते शेतकऱ्यांना संघटित करण्याचा प्रयत्न करत होते. शेतकरी आंदोलनाचा त्यांचा प्रयत्न होत्या. पुण्यात पत्रकार परिषदेत पवारांना पटोलेंच्या या आंदोलनाविषयी पत्रकारांनी पवारांना विचारले. त्यावर, `जरा शहाण्या माणसाविषयी विचारा`, असे म्हणून पटोलेंची आपण दखल घेत नसल्याचे पवारांनी दाखवून दिले होते. 

फडणविसांना टोले...

कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे हे भाजपच्या कोट्यातून  राज्यसभेचे खासदार झाले होते. त्यावर पवारांना विचारणा केली असता पवारांनी एका दगडात अनेक पक्षी मारले होते. `या आधी छत्रपती हे पेशव्यांची निवड करत होते. आता फडणवीस हे छत्रपतींची नियुक्ती करत आहेत, `अशी प्रतिक्रिया देऊन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संभाजीराजे दोघांनाही टोमणा मारला होता. तसेच या विधानातून आपल्या पाठिराख्यांसाठी योग्य तो संदेशही दिला होता. गेल्या विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्यासमोर मैदानाक कोणी पहिलवान नाही, अशी वल्गना केली होती. या टिकेला जाहीर सभांतून प्रत्युत्तर देताना हातवारे करत कुस्तीसाठी पहिलवान असावे लागतं `असल्या` पहिलावनाबरोबर कोण कुस्ती करणार, असे प्रत्युत्तर पवारांनी दिले होते.

पृथ्वीराज चव्हाणांवर खालच्या पातळीवर टीका

पवार आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यात तसे फारसे सख्य नव्हते. चव्हाण हे मुख्यमंत्री झाल्यानंतर राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या मंत्र्यांच्या फाईल अडकल्या होत्या. त्यावर चव्हाण हे स्वाक्षरी करत नव्हते. त्यावेळी पवार हाताला लकवा झाल्यामुळे हात थरथरतो आहे का, अशी विचारण पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या जाहीर कार्यक्रमात केली होती. पुण्यातील 2007 ची महापालिका निवडणूक राष्ट्रवादीने कसून लढली होती. त्या वेळी काॅंग्रेसच्या नेतृत्त्वाखाली पुण्याचा कारभार सुरू होता. पुण्यातील सारसबागेजवळ झालेल्या प्रचाराच्या प्रारंभीची सभा पवारांनी गाजवली. भाकरी फिरवली नाही तर ती करपते...तसेच पुण्याचा कारभार बदला नाहीतर शहराचे वाटोळे झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा दिला होता. त्यांचा कारभारी बदला, या वाक्याचा निवडणुकी मोठा परिणाम झाला. पुरंदरमध्ये 2004 च्या विधानसभा निवडणुकीत जनता दलाचे ज्येष्ठ नेते दादा जाधवराव हे राष्ट्रवादीच्या विरोधात निवडणूक लढवत होते. त्यावेळी झालेल्या सभेत जाधवरावांवर टीका करताना म्हाताऱ्या बैलाला बाजार दाखवावा लागेल, असे आवहान मतदारांना केले होते. ते मतदारांनी पाठले होते. 

शरद पवार हे केंद्रीय कृषिमंत्री असताना पुण्यात परिषद झाली होती. त्यात रिलायन्स पुणे जिल्ह्यात खासगी साखर कारखाना सुरू करणार असल्याची माहिती त्यांनी या परिषदेत बोलताना दिली होती. त्यावर बरेच राजकीय वादळ नंतर उठले होते. ही परिषद झाल्यानंतर पत्रकारांनी साहजिकच रिलायन्सविषयी पवारांना प्रश्न विचारला. त्यावेळी मी काय रिलायन्सचा प्रवक्ता आहे का, असे म्हणत त्यांनी फटकारले. पुण्यात अडचणीचा प्रश्न एका पत्रकाराने विचारला त्या वेळी पुण्यातील जर्नलिझम काॅलेजची क्वालिटी इतकी घसरली आहे, हे मला माहीत नाही, असे चिडून उदगार काढले होते. सुरेश कलमाडी यांनी काॅंग्रेसचा 1998 च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी काॅंग्रेसचा त्याग केला होता. त्यामुळे पुण्यात काॅंग्रेसचा उमेदवार कोण, अशी चर्चा सुरू होती. तेव्हा पुण्यातील पत्रकाराने पवार साहेब तुम्ही मग पुण्यातून उभे राहण्याचे आव्हान स्वीकारणार का, असा बेधडक सवाल केला. त्यावर चिडलेल्या पवारांनी इमॅच्युअर प्रश्न म्हणून चिडून उत्तर दिले होते. जाहीरपणे इमॅच्युअर हा शब्द त्यांनी परत पार्थसाठीच वापरला.  

विधानसभेच्या 2004 निवडणुकीच्या पुण्यातील तत्कालीन बोपोडी मतदारसंघात काॅंग्रेसचे उमेदवार माजी मंत्री चंद्रकात छाजेड हे होते. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले एक पहिलवान उमेदवार होते. त्या निवडणुकीत हे पहिलवान उमेदवार बरीच दमदाटी करत आल्याच्या तक्रारी पवारांपर्यंत गेल्या होत्या. छाजेड यांच्या प्रचारासाठी झालेल्या सभेत पवार यांनी विरोधी उमेदवाराचा सारी मस्ती एकाच वाक्याने उतरवली होती.  `आमच्या उमेदवाराला किंवा कार्यकर्त्यांना दमदाटी केली तर, सात जन्माची अद्दल घडेल, असा धडा शिकवेल ` हे वाक्य पवार यांनी असे उच्चारले होते की दुसऱ्या दिवसापासून तेथील निवडणूक प्रचार सुरळीत पार पडला.

शरद पवार व राजू शेट्टी यांच्यात आता सलोखा असला तरी हे दोघे एकमेकांवर तुटून पडत होते. बारामती येथे पवारांच्या बंगल्यासमोर शेट्टी यांनी 2012 मध्ये आंदोलन केले होते. त्यावेळी बारामती येथील जाहीर कार्यक्रमात शरद पवार यांनी शेतकरी संघटनेच्या आंदोलनावर टीका करत ‘राजू शेट्टी कोण? त्यांची जात काय, शेतीच्या प्रश्नांशी आणि उसाच्या भावाशी त्यांचा संबध काय? शेतकरी आणि त्यांच्या समाजात फरक आहे. ‘आमचे’ कारखाने बंद आहेत आणि ‘त्यांचे’ कारखाने चालू आहेत, ’ अशी टीका करत त्यांची ‘जात’ काढली होती.

पवार यांची अशी अनेक उदाहरणे आहेत. तुम्हाला कोणती आठवलीत? ते काॅमेन्ट बाॅक्समध्ये आवर्जून लिहा. 

  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com