पाटणा : परतीच्या पावसाने राज्याला झोडपून काढले आहे. नदी-नाल्यांना महापूर आला आहे. राज्यात अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. सर्वाधिक नुकसान शेतकऱ्यांचे झाले असून काढणीसाठी आलेल्या पिकांची नासाडी झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा करावा, जेणेकरून लोकांना दिलासा मिळेल, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
परतीच्या पावसाने राज्यात पूरग्रस्त स्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास या पावसाने हिरावून घेतला आहे. त्यामुळे कर्जबाजारी असलेला शेतकरी हताश झाला आहे.
तो आता सरकारच्या मदतीची अपेक्षा करीत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूरस्थिती असलेल्या भागाचा दौरा करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, त्याचबरोबर डिझास्टर मॅनेजमेंटच्या टीम बरोबर बैठक घेऊन जी काही मदत देता येईल, त्याची तात्काळ घोषणा करावी, अशी मागणी अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.
राज्याच्या काही भागांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच पुढील चार दिवसात पुन्हा पाऊस कोसळण्याचा इशारा हवामान विभागाने दिल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून पुणे, कोकण, औरंगाबाद आणि नाशिक विभागीय आयुक्त तसेच या विभागातील जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधून पूरस्थितीचा आढावा घेतला आहे.
हेही वाचा : शरद पवार शेताच्या बांधावर..मुख्यमंत्री दूरचित्रवाणीवर...?
मुंबई : कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात पावसामुळे पिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. पावसामुळे हातचे पीक गेल्याने बळीराजा अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्याला दिलासा देण्याची मागणी विरोधक वारंवार करत असून विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मराठवाडा दौऱ्यावर जाणार आहेत, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मात्र अजूनही घरात बसूनच अधिकाऱ्यांच्या आढावा बैठक घेण्यात मग्न आहेत. शरद पवार दोन दिवसांच्या मराठवाड्याचा दौऱ्यावर असणार आहेत. ता. १८ आणि १९ ऑक्टोबर असा दोन दिवस हा दौरा असणार आहे. आंध्र ओडिशा आणि तेलंगणा राज्याला अशाच अतिवृष्टीचा आणि पुराचा फटका बसला आहे. तेथील मुख्यमंत्र्यांनी विविध ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पाहण्या केल्या असून हवाई दौरेही काढले आहे. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र अजूनही घराबाहेर पडलेले नाहीत, असे तरी सध्याचे चित्र आहे. राज्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शरद पवार हे शेतकऱ्यांना भेटण्यासाठी जाणार आहेत, तर दुसरीकडे मुख्यमंत्री हे फक्त दुरचित्रवाणीवरून शेतकऱ्यांना दिलासा देणार की नुकसानग्रस्त भागाचा दैारा करणार हे लवकरच समजेल.
Edited by : Mangesh Mahale
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.