काँग्रेस प्रदेशाध्यक्षावर आज तरी शिक्कामोर्तब होणार का...

नाना पटोले, सुनील केदार, यशोमती ठाकूर, राजीव सातव,संग्राम थोपटे यांच्या नावांची चर्चा आहे.
Sarkarnama Banner.jpg
Sarkarnama Banner.jpg

पुणे : महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा तिढा काही केल्या सुटताना दिसत नाही. काँग्रेस प्रदेशाअध्यक्षांवरून पक्षांतर्गत अनेक घडामोडींना वेग आला आहे. आज काँग्रेसचे सर्व मंत्री दिल्लीत बैठकीसाठी उपस्थित आहे. महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस पक्ष कार्यालयात ही बैठक होत आहे. विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष नाना पटोले, मंत्री सुनील केदार, यशोमती ठाकूर आणि राहुल गांधी यांचे विश्वासू राजीव सातव, भोरचे आमदार संग्राम थोपटे यांच्या नावांची चर्चा आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्षावर आज तरी शिक्कामोर्तब होणार का, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

दिल्लीत शेतकऱ्यांचे कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन सुरु आहे. त्याबाबतही महाराष्ट्रात काय भूमिका घ्यावी, यावरही या बैठकीत विचारविनिमय होण्याची शक्यता आहे. पाच राज्यांच्या विधानसभा  निवडणुकीबाबत  बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती आहे. बैठकीला काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह सुनील केदार, विजय वडेट्टीवार, अशोक चव्हाण, के सी पाडवीसह अनेक नेते उपस्थित राहणार आहे. 

काँग्रेस पक्षात सध्या अस्वस्थता आहे. काही महिन्यांपूर्वी पक्ष नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे पत्र पक्षातील २३ ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना लिहिले होते. ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्या नेतृत्वाखाली कपिल सिब्बल, आनंद शर्मा, पृथ्वीराज चव्हाण आदी नेत्यांचा त्यामध्ये समावेश होता. या पत्राने पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आले. त्यानंतर पक्षाची तातडीची बैठक घेऊन या नेत्यांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले. या नेत्यांचे समाधान झाल्याचा दावा अन्य नेत्यांकडून करण्यात आला होता. पण त्यानंतरही पक्ष नेतृत्वामध्ये बदल झाला नाही. काही नेत्यांनी सोनिया गांधी यांच्यावरच विश्वास व्यक्त केला. तर एका गटाने राहुल गांधींनाच पुन्हा अध्यक्ष करण्याबाबत मत व्यक्त केले होते. त्यानंतर आता जून महिन्यात काँग्रेसचा अध्यक्ष निवडण्यासाठी बैठक होणार आहे. त्याबाबतही बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. 

राज्यात नुकत्याच ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. त्यात चार हजारांहून अधिक ग्रामपंचायती काँग्रेसने जिंकल्याचा दावा विद्यमान प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला होता. आजच्या बैठकीत या निवडणुकांच्या निकालाचा आढावाही घेतला जाण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून थोरात प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा आहे. विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष नाना पटोले यांचे नांव प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चेत आहे. 

'काँग्रेसने विदर्भातला प्रदेशाध्यक्ष द्यावा’ अशी आग्रही मागणी काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांनी हायकमांडकडे केली. प्रदेशाध्यक्ष होणाऱ्या व्यक्तीकडे मंत्रीपद असावं, अशीही त्यांची मागणी आहे. त्यामुळे विजय वडेट्टीवार, नितीन राऊत, सुनील केदार, यशोमती ठाकूर यांच्यासाठी फील्डिंग करताना दिसत आहेत. महाराष्ट्र काँग्रेसचा अध्यक्ष ओबीसी समाजातून झाल्यास आनंदच होईल, असंही धानोरकर म्हणाले होते. त्यामुळे धानोरकरांचा रोख वडेट्टीवारांकडे असल्याचं स्पष्ट होतं.  विधानसभा अध्यक्ष नाना पटोलेही काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेसने विधानसभा अध्यक्ष बदलण्याचं ठरवल्यास महाविकास आघाडी सरकार आणि राष्ट्रवादीला कोणतीही अडचण नाही. पटोलेही विदर्भातील नेते आहेत, परंतु ‘मंत्रिपद असलेला प्रदेशाध्यक्ष’ असं धानोरकरांनी म्हटल्यामुळे त्यांच्या मनात नेमके कोण आहेत, हा प्रश्न निर्माण होतो.
Edited  by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com