पिंपरी : मनसेचा पुणे जिल्हा संघटक अभय अरुण वाडेकर (रा. चाकण, ता. खेड, जि.पुणे) याला खंडणीच्या गुन्ह्यात चाकण पोलिसांनी काल रात्री अटक केली. एका शिक्षण संस्थाचालकाकडे एक लाख रुपयांची खंडणी मागून त्यातील तीस हजार रुपये त्याने घेतले होते. उर्वरित पैशासाठी तो धमकावत असतानाच पोलिसांनी त्याला पकडले. त्याला खेड न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
महेंद्र इंद्रनिल सिंग (वय ५१, रा. भोसरी, पिंपरी-चिंचवड) या शिक्षण संस्थाचालकांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. त्यांची वाकी खुर्द, चाकण (ता. खेड, जि. पुणे) येथे प्रियदर्शिनी इंग्लिश मिडियम स्कूल आहे. गेल्या महिन्याच्या २७ तारखेला वाडेकर हा सिंग यांच्या शाळेत गेला. लॉकडाऊन असतानाही विद्यार्थ्यांच्या पालकांकडून जास्त फी का आकारली अशी विचारणा लेखी विचारणा त्याने केली. त्यानंतर या महिन्याच्या पाच तारखेला त्याने सिंग यांना भोसरीतील नाना, नानी पार्कमध्ये बोलावले.
'आम्ही आंदोलन करून तुमच्या शाळेची बदनामी करू, असे त्याने धमकावले. ते होऊ द्यायचे नसेल, तर एक लाख रुपये द्यावे लागतील,' असे त्याने सांगितले. आपल्या एका कार्यकर्तीच्या मुलीची फी सुद्धा घेऊ नको, असे सुद्धा बजावले. पाच हजाराचा पहिला हफ्ता पहिल्याच भेटीत त्याने घेतला. नंतर ७ तारखेला चाकणला आंबेठाण चौकात सिंग यांच्याकडून त्याने २५ हजार घेतले. यावेळी यापेक्षा अधिक पैसे देऊ शकणार नाही, असे सिंग म्हणाले. त्यावर शाळेची बदनामी करण्याची पुन्हा धमकी वाडेकरने दिली. एवढेच नाही, तर उर्वरित पैशासाठी ,त्याने काल पुन्हा फोन केला. यानंतर मात्र सिंग यांनी पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनीही तत्परतेने गुन्हा नोंदवित लगेच आरोपीला अटक केली.
हेही वाचा : उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला आणखी एक दणका..
मुंबई : कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेडचे काम थांबवून परिस्थिती जैसे थे ठेवण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आज दिला. हा राज्यातील महाविकास आघाडी सरकारला न्यायालयाने दिलेला आणखी एक धक्का आहे. दरम्यान,याविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या विचारात सरकार आहे. या निर्णय़ामुळे मेट्रो तीनच्या कामाला करकचून ब्रेक लागला आहे. अगोदरच रखडलेले कारशेडचे काम आता दोन महिने पूर्ण ठप्पच होणार आहे. पुढेही ते न्यायालयीन प्रक्रियेतच अडकून राहणार असल्याने एकूणच मेट्रो विस्तार प्रकल्प आणखी रेंगाळणार आहे. दरम्यान, या निर्णयाने भाजपला आनंदाच्या उकळ्या फुटल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता जनतेची जाहीर माफी मागावी, अशी मागणी भाजपचे नेते व स्थानिक माजी खासदार नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी राजीनामा द्यावा, असे त्यांनी या निर्णयानंतर लगेचच घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.