तेजस्वी अन् तेजप्रताप यादव यांची उमेदवारी रद्द होणार का? चेंडू निवडणूक आयोगाच्या कोर्टात

बिहारच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आज दुसऱ्या टप्प्यात 94 मतदारसंघात मतदान झाले.
JDU submits memorandum to EC against Tejashwi and TejPratap Yadav
JDU submits memorandum to EC against Tejashwi and TejPratap Yadav

पाटणा : राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव आणि त्यांचे बंधू तेजप्रताप यादव हे अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यांनी उमेदवारी अर्ज भरताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांवरुन वाद निर्माण झाला आहे. संयुक्त जनता दलाने (जेडीयू) या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. या मुद्द्यावरुन राज्यातील वातावरण तापले आहे. 

लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी आणि तेजप्रताप यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी जेडीयूने केली आहे. तेजस्वी हे राघोपूर मतदारसंघातून तर तेजप्रताप हे हसनपूर मतदारसंघातून उभे आहेत. जेडीयूने निवडणूक आयोगाला दोघांच्या मालमत्तांसंबंधी पुरावेही सादर केले आहेत. याबाबतचे पत्र जेडीयूने निवडणूक आयोगाकडे दिले आहे. तेजस्वी हे महाआघाडीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार आहेत. तेजस्वी यांना या निवडणुकीत मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्या सभांना होणारी गर्दी पाहून अनेक नेते या निवडणुकीत तेजस्वी लाट आल्याचा दावा करीत आहेत. 

तेजस्वी आणि तेजप्रताप यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात काही मालमत्तांचा उल्लेख जाणीवपूर्वक केलेला नाही, असा आरोप जेडीयूने केला आहे. यामुळे त्या दोघांची उमेदवारी रद्द करुन त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करावा, अशी मागणी जेडीयूने केली आहे. याविषयी बोलताना जेडीयूचे नेते व माहिती व जनसंपर्क मंत्री नीरज कुमार म्हणाले की, निवडणूक आयुक्तांना आम्ही निवेदन दिले आहे. त्यांनी या प्रकरणी योग्य कारवाई करण्याचे आश्वासन आम्हाला दिले आहे. 

बिहार विधानसभेची निवडणूक तीन टप्प्यांत होत आहे. पहिला टप्पा २८ ऑक्टोबरला झाला असून, यात ७१ मतदारसंघ होते. दुसरा टप्पा आज झाला असून, यात ९४ मतदारसंघ आहेत. तिसरा टप्पा ७ नोव्हेंबर असून, यात ७८ मतदारसंघ आहेत. निकाल १० नोव्हेंबरला जाहीर होणार आहेत.  बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत सत्तारुढ संयुक्त जनता दल (जेडीयू) आणि भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), काँग्रेस आणि डावे यांची महाआघाडी असे चित्र आहे.

राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) एलजेपी बाहेर पडला आहे. चिराग पासवान यांनी राष्ट्रीय स्तरावर आणि लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत राहण्याची भूमिका घेतली आहे. परंतु, बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पातळीवर जेडीयूसोबत वैचारिक मतभेद असल्याचे कारण देत स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, भाजपचे मोठ्या प्रमाणात बंडखोर नेते एलजेपीत दाखल झाले आहेत. ते जेडीयूच्या विरोधात मैदानात उतरले आहेत. यामुळे भाजप आणि चिराग पासवान यांची छुपी युती असल्याची चर्चा सुरू आहे. 

बिहारमधील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) आणि महाआघाडीला टक्कर देण्यासाठी ग्रँड डेमोक्रॅटिक सेक्युलर फ्रंट स्थापन करण्यात आला आहे. राष्ट्रीय लोक समता पक्षाचे उपेंद्र कुशवाह हे फ्रंटचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार आहेत. यात ओवेसी यांचा ऑल  इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुसलमीन (एआयएमआयएम), मायावती यांचा बहुजन समाज पक्ष (बसप), सुहेलदेव भारतीय समाज पार्टी, सामाजिक जनता दल (डेमोक्रॅटिक) आणि जनतांत्रिक पार्टी (सोशालिस्ट) समावेश आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com