नवी दिल्ली : भारतात एक मेपासून कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू होत आहे. या टप्प्यामध्ये 18 ते 45 वयोगटातील नागरिकांना लस दिली जाणार आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॅा. हर्षवर्धन यांनी राज्यांना लशींचा पुरेसा पुरवठा केला जात असल्याचा दावा केला आहे. पण महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी लशींचा पुरेसा साठा नसल्याने तिसरा टप्पा सुरू करता येणार नाही असे म्हटले आहे.
डॅा. हर्षवर्धन यांचा दावा आता भाजपच्या राज्यांनीच खोडून काढला आहे. गुजरातसह हिमाचल प्रदेश, हरयाणाच्या सरकारांनी आपल्याकडे लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यासाठी पुरेसा साठा नसल्याचे म्हटले आहे. लस उत्पादक कंपन्यांकडून पुरवठा झाल्यानंतरच 18 ते 45 वयोगटासाठी लसीकरणाला सुरूवात करता येईल, असेही या राज्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे लशींचा तुटवडा नसल्याचा दावा करणाऱ्या केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना घरचा आहेर मिळाला आहे.
गुजरात सरकारने म्हटलं आहे की, 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना लसीकरण सुरू करायचे आहे. पण कंपन्यांकडून लशीचे पुरसे डोस मिळाल्यानंतरही हे सुरू केले जाईल. तर हिमाचल प्रदेश सरकारनेही लशींचा अॅार्डर दिल्याचे सांगत सरकारी लसीकरण केंद्रात ही अॅार्डर मिळाल्यानंतरच संबंधितांना लस दिली जाईल, असे स्पष्ट केले आहे.
हरयाणा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हरयाणामध्ये लशींचा तुटवडा आहे. पण ही परिस्थिती फक्त हरयाणामध्ये नसून संपूर्ण देशातच आहे. त्यामुळे राज्याला अपेक्षेप्रमाणे लस मिळत नाही. त्यामुळे लसीकरणावर परिणाम झाला आहे. 1 मेपासून सुरू होणाऱ्या लसीकरणासाठी आम्ही अॅार्डर दिली आहे.
दरम्यान, केंद्रीय आरोग्यमंत्री डॅा. हर्षवर्धन म्हणाले, देशात सध्या विविध राज्यांत मिळून एक कोटींहून अधिक डोस शिल्लक आहेत. पुढील 2-3 दिवसांत आणखी पुरवठा केला जाणार आहे. राज्यांच्या क्षमतेनुसार त्यांना पुरवठा केला जात आहे. दररोज लशींचा पुरवठा सुरू आहे.
Edited By Rajanand More
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.