मुंबई : नाना पटोले यांना विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच्या टायमिंगवरून महाविकास आघाडीतील इतर दोन पक्ष थोडेसे नाराज असल्याची चर्चा आहे. हे सरकार स्थिरस्थावर होत असताना पटोले यांनी राजीनामा देवू नये, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पटोलेंना केली होती. मात्र नवी जबाबदारी पक्षाकडून मिळत असल्यामुळे राजीनामा देत असल्याचे नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांना आजच्या सांगितले.
मंत्रालयात आज मंत्रीमंडळ सुरू होण्यापूर्वी दुपारी नाना पटोले यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यात आपण राजीनामा देणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावेळी या दोघांदरम्यान वरील संवाद झाला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेही असेच मत आल्याची चर्चा आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तोंडावर पटोलेंनी राजीनामा दिल्याने अध्यक्षपदाच्या निवडीसाठी राजकीय धुळवड रंगू शकते. ती टाळायला हवा होती, असे मत व्यक्त करण्यात आले.
नाना पटोले यांनी आपला विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे विधानभवन येथे आज सुपूर्द केला. गेल्या काही दिवसांपासून पटोले हे प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष होतील अशी चर्चा सुरू होती आणि त्यासाठी ते विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देतील असेही म्हटले जात होते. त्यानुसार काल 10 जनपथ, दिल्ली येथे राहुल गांधी यांची नानांनी भेट घेतल्यानंतर सगळ्या घडामोडींना वेग आला. अखेर आज दुपारी नाना पटोले यांनी मंत्रीमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेतल्यानंतर विधानभवनात येऊन राजीनामा दिला.
राहुल गांधी यांनी त्यांच्यापुढे दोन नेत्यांचे नाव घेत त्यांना आदर द्या पण त्यांना घाबरू नका, अशा शब्दांत संदेश दिला आहे. त्यातील एक नेता मराठवाड्यातील तर दुसरा पश्चिम महाराष्ट्रातील आहेत. त्यामुळे नाना पटोले या दोन नेत्यांशी किती सलोख्याने वागणार, याची उत्सुकता आहे.
पटोले हे विदर्भातील बहुजन समाजाचे आक्रमक नेते असून , १९९९ पासून साकोली विधानसभा मतदारसंघाचे सातत्याने ते प्रतिनिधित्व करतात. २००८ मध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी वाद झाल्याने त्यांनी काँग्रेसला `राम राम` ठोकून २००९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून आमदार झाले आणि २०१४ मध्ये भाजपच्याच चिन्हावर लोकसभेत खासदार म्हणून निवडून आले. पण पंतप्रधान मोदी यांच्या शेतकऱ्यांविरोधी भूमिकेमुळे नाराज होऊन भाजपला सोडचिठ्ठी देऊन मोदींशी दोन हात करणारे नेते ठरले.

