बिहारमध्ये निवडणुकीच्या निकालाआधीच भाजपची विक्रमी कामगिरी

बिहारमधील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी विरोधात महाआघाडी असे चित्र आहे.
bjp face unprecedented revolt in party in bihar assembly election
bjp face unprecedented revolt in party in bihar assembly election

पाटणा : बिहारच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने निकालाआधीच अनोखा विक्रम नोंदवला आहे. पक्षाची ही विक्रमी कामगिरी सर्वांचेच लक्ष वेधून घेणारी ठरली आहे. भाजपने आतापर्यंत 43 बंडखोर नेत्यांना बाहेरचा रस्ता दाखवला असून, हा विक्रम ठरला आहे. हे नेते केवळ मुख्यालय स्तरावरील आहेत. यात जिल्हा स्तरावरील नेत्यांची संख्या लक्षात घेता हा आकडा आणखी मोठा आहे. भाजपचे सुमारे अडीच डझन बंडखोर नेते लोक जनशक्ती पक्षाकडून रिंगणात उतरले आहेत. 

भाजपला याआधी बिहारमध्ये फारसा बंडखोरीचा सामना कधीही करावा लागला नव्हता. मात्र, ही निवडणूक त्याला अपवाद ठरली आहे. पक्षाला या वेळी प्रथमच मोठ्या प्रमाणात बंडखोरीचा सामना करावा लागला. यातील बहुतांश बंडखोर चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षात गेले आहेत. यात पक्षाच्या अनेक बड्या नेत्यांचा समावेश आहे. यामुळे भाजप आणि लोक जनशक्ती पक्षाची छुपी युती असल्याची चर्चा सुरू आहे. 

बिहारमध्ये भाजपच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात बंडखोरी होत आहे. पक्षाने मुख्यालय स्तरावरील 43 नेत्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. हे बंडखोर विद्यमान अथवा माजी आमदार आहेत. याचबरोबर जिल्हा स्तरावरील नेत्यांनीही मोठ्या प्रमाणात बंडखोरी केली आहे. त्यांची संख्या आणखी वेगळीच आहे. भाजपच्या बंडखोरांतील सुमारे अडीच डझन नेते हे लोक जनशक्ती पक्षाकड़ून संयुक्त जनता दलाच्या विरोधात मैदानात आहेत. 

मागील विधानसभा निवडणुकीत 2015 मध्ये भाजपने 157 जागांवर उमेदवार उभे केले होते. या वेळी पक्षाने 110 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. मागील निवडणुकीच्या तुलनेत पक्षाच्या 47 जागा कमी झाल्या आहेत. याचबरोबर भाजपचे काही परंपरागत मतदारसंघ जागा वाटपात जेडीयू आणि विकासशील इन्सान पार्टीकडे गेले आहेत. येथील भाजपच्या नेत्यांनी बंडखोरी करुन लोक जनशक्ती पक्षाकडून उमेदवारी मिळवली आहे. 

बिहार विधानसभेची निवडणूक तीन टप्प्यांत होत आहे. यातील पहिला टप्पा २८ ऑक्टोबरला झाला असून, यात ७१ मतदारसंघ होते. दुसरा टप्पा  ३ नोव्हेंबरला असून, यात ९४ मतदारसंघ आहेत. तिसरा टप्पा ७ नोव्हेंबर असून, यात ७८ मतदारसंघ आहेत. निकाल १० नोव्हेंबरला जाहीर होणार आहेत. बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत सत्तारुढ संयुक्त जनता दल (जेडीयू) आणि भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), काँग्रेस आणि डावे यांची महाआघाडी असे चित्र आहे. 

एनडीएमधून लोक जनशक्ती पक्ष (एलजेपी) बाहेर पडला आहे. चिराग पासवान यांनी राष्ट्रीय स्तर आणि लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत राहण्याची भूमिका घेतली आहे. परंतु, बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पातळीवर जेडीयूसोबत वैचारिक मतभेद असल्याचे कारण देत स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.  

बिहारमधील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) आणि महाआघाडीला टक्कर देण्यासाठी ग्रँड डेमोक्रॅटिक सेक्युलर फ्रंट स्थापन करण्यात आला आहे. राष्ट्रीय लोक समता पक्षाचे उपेंद्र कुशवाह हे फ्रंटचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार आहेत. यात ओवेसी यांचा ऑल  इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुसलमीन (एआयएमआयएम), मायावती यांचा बहुजन समाज पक्ष (बसप), सुहेलदेव भारतीय समाज पार्टी, सामाजिक जनता दल (डेमोक्रॅटिक) आणि जनतांत्रिक पार्टी (सोशालिस्ट) समावेश आहे. 

Edited by Sanjay Jadhav 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com