सोलापूर : वाढीव वीज बिलांसदर्भात ऊर्जा खात्याने 50 टक्के वीजबिल माफीचा प्रस्ताव तयार केला होता. मात्र, ऊर्जामंत्री नितीन राऊत हे त्यावर ठामपणे भूमिका घेऊ शकले नाहीत. ते कॉंग्रेसचे दुबळे मंत्री आहेत. त्यातही मागासवर्गीय असल्याने बारामतीकरांच्या पुढे ते जाऊ शकले नाहीत. या सर्वांमध्ये बारामती अडथळा असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केली.
सोलापुरात शनिवारी (ता. 20 मार्च) आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आंबेडकर बोलत होते. या वेळी आंबेडकर यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यावर टीका केली.
आंबेडकर म्हणाले, वीजबिलाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांचा खोटारडेपणा उघड झाला आहे. विधानसभेत त्यांना घेराव घातला जाऊ नये; म्हणून अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी वीज कनेक्शन तोडणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले. मात्र, शेवटी पुन्हा वीज कनेक्शन तोडणीवरील स्थगिती हटवली. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील नागरिकांना संधी मिळाली आहे की त्यांनी खोटारड्या मंत्र्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी.
दरम्यान, वीज कनेक्शन तोडणीसाठी कोणी आल्यास त्याला बडवा असे धक्कादायक आवाहन देखील प्रकाश आंबेडकर यांनी या वेळी केले. "कोणी वीज कापायला आले तर त्यांना बडवा, कितीही गुन्हे दाखल झाले तर होऊद्या. शासकीय गुन्हे चालवायला किती सरकारी वकील आहेत?' असा प्रश्न उपस्थित करत प्रकाश आंबेडकरांनी वीजबिल वसुलीसाठी वीज कनेक्शन तोडणीला विरोध दर्शवला.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनामुळे रिक्त झालेल्या पंढरपूर विधानसभेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या पोटनिवडणुकीत वंचित बहुजन आघाडी उमेदवार देणार असल्याची घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी या वेळी केली. पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उद्या (रविवारी, ता. 21 मार्च) पंढरपुरात वंचित बहुजन आघाडीची बैठक होणार आहे. ही पोटनिवडणूक सर्वांसाठी कठीण असणार आहे. मात्र, आम्ही ही पोटनिवडणूक लढवणार आहोत,' असेही आंबेडकरांनी या वेळी सांगितले.
हे पंतप्रधानपदाला शोभणारे नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदाची गरिमा घालवली, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली. देश स्वतंत्र्य झाल्यापासून कोणत्याही राज्याच्या निवडणुकीत पंतप्रधान केवळ 1 किंवा 2 वेळा जातात. मात्र बंगालच्या निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आतापर्यंत 17 वेळा जाऊन आले आहेत. हे पंतप्रधान पदाला शोभणारे नाही. गल्लीतला कार्यकर्तादेखील आजकाल पंतप्रधानावर टीका करू लागला आहे. नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाची गरीमा घालवली आहे.
भारतीय जनता पक्षाने याचा विचार केला पाहिजे, अशी टीका आंबेडकर यांनी केली. तसेच, चीनने सीमेवरुन आपले सैन्य अद्याप मागे घेतलेले नसताना त्यांना गुंतवणुकीसाठी कशी काय परवानगी देण्यात आली, याचा खुलासा पंतप्रधान मोदी यांनी करावा, असा सवालही आंबेडकरांनी उपस्थित केला.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.