शिरूर : "आम्हा खासदारांपेक्षा आमदार बरे; त्यांना निदान घसघशीत निधी तरी मिळतो आहे. आमच्या निधीचे पैसे कुठे जातात, त्याचा हिशेबच नाही. केंद्र सरकारला हिशेबाचे विचारले की लगेच मागे "ईडी' लावली जाते,' असा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजप सरकारवर केला.
विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीच्या निमित्ताने सुळे यांनी शिरूर तालुक्याचा दौरा केला. त्या वेळी त्यांनी विविध विषयांवर बोलत असताना केंद्र सरकारवर वरील आरोप केला.
त्या म्हणाल्या, "आम्हा खासदारांपेक्षा आमदार बरे; त्यांना निदान घसघशीत निधी तरी मिळतो आहे. आमच्या निधीचे पैसे कुठे जातात, त्याचा हिशेबच नाही. कोरोनाकाळात निधीमध्ये कपात केली असली; तरी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने आमदारांना चांगला निधी दिला आहे. तो आमच्या निधीपेक्षा चांगलाच घसघशीत आहे.''
"केंद्र सरकारने वीस हजार कोटी रूपयांची संसद भवनाची नवी इमारत उभारायचे ठरविले आहे. परंतु आहे तीच संसदेची इमारत खूप रेखीव आणि चांगल्या स्थितीत आहेत. या निधीतून किती शाळा, किती रुग्णालये उभी राहू शकतात, किती रस्त्यांची कामे होऊ शकतात, याचा विचार केंद्राने प्राधान्याने केला पाहिजे,'' असेही खासदार सुळे यांनी सरकारला सुचविले.
"खासदार निधी कुठे गेला, याचा हिशेब केंद्र सरकारने द्यावा. कारण, आम्हालाही तो आमच्या जनतेला द्यावा लागणार आहे. पण, त्यांच्याकडे हिशेबाचे विचारले की लगेच पाठीमागे "ईडी' लावली जातो. पण, "ईडी'चे त्यांचे फासेही पवारसाहेबांनी उलटवले असल्याने घाबरायचे कारण नाही. पंगा घ्यायचा असेल; तर मोठ्यांशी घ्या, आमच्या वाटेला जाऊ नका,'' असा इशाराही सुप्रिया सुळे यांनी भाजप सरकारला दिला.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.