भगिरथ भालकेंच्या पराभवाचे अजित पवारांनी सांगितले हे कारण...

आम्हीदेखील मागच्या भारत भालके यांच्या निवडणुकीपेक्षा जादा मते घेतली आहेत.
Ajit Pawar said that the reason for Bhagirath Bhalke's defeat was
Ajit Pawar said that the reason for Bhagirath Bhalke's defeat was

पुणे : ‘‘शेवटच्या दोन दिवसांत जो ‘चमत्कार’ झाला, त्या ‘चमत्कारा’ला आम्ही कमी पडलो. म्हणून पंढरपूर-मंगळवेढा (Pandharpur-Mangalvedha) विधानसभा पोटनिवडणुकीत आमचा पराभव झाला आणि भाजपचे समाधान आवताडे निवडून आले,’’ अशा शब्दांत पोटनिवडणुकीतील राष्ट्रवादीचे उमेदवार भगिरथ भालके (Bhagirath Bhalke)यांच्या पराभवाचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी विश्लेषण केले. (Ajit Pawar said that the reason for Bhagirath Bhalke's defeat was ...)

पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार बोलत हेाते. त्या वेळी त्यांनी पंढरपूरच्या पराभवावर भाष्य केले. राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनामुळे झालेल्या पोटनिवडणुकीसाठी भाजपने समाधान आवताडे यांना, तर राष्ट्रवादीने भारतनानांचे चिरंजीव भगिरथ भालके यांना उमेदवारी दिली होती. दोन्ही बाजूंनी अटीतटीने ही पोटनिवडणूक लढली गेली. त्यात भाजपकडून विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खिंड लढवली होती. दोन्ही बाजूने आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या गेल्या.

चुरशीने झालेल्या पोटनिवडणुकीच्या निकालात मात्र भाजपचे समाधान आवताडे यांनी भगिरथ भालके यांच्यावर ३७३३ मतांनी विजय मिळविला होता. त्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार यांनी वरील स्पष्टीकरण दिले.

ते म्हणाले की लोकांनी मतं दिली नाहीत, त्यामुळे आमचा पराभव झाला. एवढंचं झालं आहे. मतं का नाही दिली, तर मागच्या निवडणुकीत परिचारक हे भारतीय जनता पक्षाकडून, समाधान आवताडे हे अपक्ष उभे होते. मागच्या निवडणुकीत जो अपक्ष उमेदवार पराभूत झाला होता. त्या अपक्ष उमेदवाराला म्हणजे आवताडे यांना भाजपने तिकिट दिलं. त्यामुळे आवताडे यांना मानणारी मतं आणि परिचारक म्हणजे भाजपची मते अशी ती एकत्रित करण्याचा प्रयत्न केला. आम्हीदेखील मागच्या भारत भालके यांच्या निवडणुकीपेक्षा जादा मते घेतली आहेत. आम्हीही विजयापर्यंत पोचत आलो होतो. पण, शेवटच्या दोन दिवसांत जो चमत्कार झाला, त्या चमत्काराला आम्ही कमी पडलो. म्हणून ते निवडून आले.

उजनीच्या पाण्याबाबत काय म्हणाले अजित पवार ?

‘‘उजनी धरणाच्या पाणीप्रश्नी सोलापूर जिल्हा, तेथील शेतकरी आणि लोकप्रतिनिधींनी कोणताही गैरसमज करून घेऊ नये. कुठलीही अन्यायकारक भूमिका सरकारमधून होणार नाही. त्याबाबतचा शब्द राज्याच्या उपमुख्यमंत्री या नात्याने मी स्वतः तुम्हाला देतो. जोपर्यंत आम्ही सरकारमध्ये आहोत, तोपर्यंत कोणावर अन्याय होऊ देणार नाही,’’ अशा शब्दांत अजित पवार यांनी सोलापूकरांना याबाबत अश्वस्त केले.

उजनी धरणाचे पाच टीएमसी पाणी इंदापूरला देण्याच्या निर्णयावरून सोलापूर जिल्ह्यात तीव्र पडसाद उमटले आहेत. त्याविरोधात सोलापूर जिल्ह्यातून विरोध वाढत आहेत. त्या पार्श्वभूमीवर पुण्यात बोलताना अजित पवार यांनी वरील भूमिका मांडली. ते म्हणाले की, इंदापूर तालुक्यातील लाकडी-निंबोडी पाणी योजनेची चर्चा गेल्या २० ते २५ वर्षांपासून सुरू आहे. त्या योजनेला एवढं पाणी लागतच नाही. कारण नसताना पाच टीमसी आणि सहा टीएमसी पाणी अशी चर्चा केली जात आहे. मी यानिमित्ताने सोलापूर जिल्ह्याला, तेथील शेतकरी आणि लोकप्रतिनिधींना आवाहन करू इच्छितो की यामध्ये तुम्ही काहीही गैरसमज करून घेऊ नये. कुठलीही अन्यायकारक भूमिका सरकार घेणार नाही. त्याबाबतचा शब्द राज्याच्या उपमुख्यमंत्री या नात्याने मी स्वतः देतो, असे पवार यांनी नमूद केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com