कोल्हापूर : राज्यपाल नियुक्त आमदारांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कोट्यातून ऐनवेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांचे नांव पुढे आल्याने जिल्ह्यातील राष्ट्रवादीत अस्वस्थता पसरली आहे. यामुळे विधानपरिषदेवर जाण्यासाठी इच्छुक असलेल्या पक्षांतील दिग्गजांची घालमेल वाढली असून पक्षश्रेष्ठींकडूनच या घडामोडी सुरू असल्याने जिल्ह्याला एक जागा मिळावी म्हणून प्रयत्न करणारे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचीही पंचाईत झाली आहे.
२००९ च्या लोकसभा निवडणुकीतील पराभव, पक्षाची मुहुर्तमेढ ज्यांच्या घरात रोवली गेली ते कै. दिग्विजय खानविलकर यांच्या कुटुंबियांनी पक्षाला दिलेली सोडचिठ्ठी, पक्षाचे दिवंगत नेते बाबासाहेब कुपेकर यांच्या कुटुंबियांनी नाकारलेली उमेदवारी, गेल्यावर्षी लोकसभेच्या तोंडावरच माजी खासदार श्रीमती निवेदीता माने यांनी धरलेली शिवसेनेची वाट, याच निवडणुकीत कोल्हापुरच्या हक्काच्या जागेवर पक्षाच्या उमेदवाराचा झालेला पराभव आदी कारणांनी अगोदरच पक्षात अस्वस्थता असताना आता पुन्हा पक्षातील इच्छुकाला डावलून पाठिंबा दिलेल्या घटक पक्षाच्या उमेदवारांचे नांव विधानपरिषदेसाठी पुढे आल्याने त्यात आणखी भर पडली आहे.
राज्यात तीन पक्षांचे सरकार सत्तेवर आहे. राज्यपाल नियुक्त आमदारांच्या एकूण १४ जागा रिक्त होणार आहेत. यातून जागा वाटप करताना आघाडीचे सुत्र कसे ठरणार यावर पुढची गणिते अवलंबून आहेत. आमदारांतून विधानपरिषदेवर निवडून द्यायच्या जागेत कॉंग्रेसला एक जागा कमी मिळाल्याने या निवडणुकीत अतिरिक्त जागा कॉंग्रेसला द्यावी लागेल. त्यातून कॉंग्रेसला चार जागा दिल्या तर उर्वरित दहा जागांपैकी शिवसेना व राष्ट्रवादीला प्रत्येकी पाच जागा येतील.
यातील एका जागेवर कोल्हापुरातून एकाला संधी मिळण्याची शक्यता होती. त्यासाठी जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार यांची नांवे चर्चेत होती. त्यातही विधानसभेच्या प्रचार सभेत पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी ए. वाय. यांना जाहीरपणे 'शब्द' दिल्याने त्यांचे पारडे जड होते. पण अचानक आपल्या वाट्याची एक जागा श्री. शेट्टी यांना सोडण्याची तयारी राष्ट्रवादीने दर्शवली आहे. जिल्ह्यात एकाचवेळी दोघांना संधी देणेही शक्य नाही. परिणामी या नव्या घडामोडीमुळे राष्ट्रवादीत मात्र अस्वस्थता पसरली आहे.
सध्या जिल्ह्यात जिल्हा बॅंकेवर राष्ट्रवादीची सत्ता आहे. महापालिका आणि जिल्हा परिषदेत कॉंग्रेसच्या मदतीने राष्ट्रवादी सत्तेत आहे. कॉंग्रेसचे जिल्ह्यात चार तर राष्ट्रवादीचे दोनच आमदार आहेत. जिल्ह्यातील दोन्ही खासदार शिवसेनेचे आहेत. अशा परिस्थितीत पक्ष वाढीच्यादृष्टीने विधानपरिषदेची एक जागा मिळणे आवश्यक होते. यापुर्वीही अशा निवडणुकीत कोल्हापुरवर दोन्हीही कॉंग्रेसकडून अन्यायच झाला आहे. निदान यावेळी तरी ही कसर भरून निघेल असे वाटत असताना नव्या घडामोडींनी त्यालाही ब्रेक लागण्याची शक्यता आहे
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.