ईदच्या पार्श्वभूमीवर अर्थकारण बिघडणार..मदरशांना फटका

यंदा चामड्याला मागणी नसल्याने मदरसे चामडे दान स्वरुपात स्विकारणार नाहीत. यामुळे बकरी ईदच्या चामड्याअभावी मदरशांचे अर्थकारण बिघडणार आहे.
2Pakistan_Trade_0_Edited_New.jpg
2Pakistan_Trade_0_Edited_New.jpg

मालेगाव  :  राज्यातील मुस्लीम बांधव बकरी ईदला लहान- मोठ्या जनावरांची कुर्बानी केल्यानंतर जनावराचे चामडे मदरशांना दान करतात. या दानातून राज्यातील पाचशेहून अधिक मदरशांना प्रत्येकी किमान दोन लाखाचा निधी मिळतो. मोठ्या मदरशांना चामडे विक्रीतून पाच लाखाहून अधिक अर्थसहाय्य होते. यंदा चामड्याला मागणी नसल्याने मदरसे चामडे दान स्वरुपात स्विकारणार नाहीत. यामुळे बकरी ईदच्या चामड्याअभावी मदरशांचे अर्थकारण बिघडणार आहे. गोवंश हत्याबंदी कायद्यानंतर देशातील चामडे उद्योगात मंदीचे साम्राज्य आहे. त्याचा फटका बकरी ईदच्या कुर्बानीनंतर चामडे विक्रीतून होणाऱ्या उलाढालीला बसणार आहे. 

मालेगाव शहरातील १५ मोठे मदरसे यापुर्वी चामडे दान स्वरुपात स्वीकारत होते. बकरी ईदनंतर कलकत्ता, कानपूर या भागातील चामड्याचे व्यापारी मोठ्या संख्येने शहरात खरेदीसाठी येत. व्यापाऱ्यांच्या स्पर्धेमुळे चामड्याला चांगला भावही मिळत होता, असे अतहर अश्रफी यांनी सांगितले. चामडे विक्रीतून मिळणाऱ्या रक्कमेतून मदरशांच्या नऊ महिन्याचा तर रमजान काळात जकातरुपी मिळणाऱ्या दानातून उर्वरित तीन महिने सुसह्य होत होते. या वेळी रमजान व बकरी ईद दोन्ही मुख्य सण कोरोना संसर्गामुळे साध्या पध्दतीने झाल्याने त्याचा मोठा फटका मदरशांना बसल्याचे आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल यांनी सांगितले. 

गेल्या वर्षी देखील मौलाना मुफ्ती यांनी पुढाकार घेऊन येथील व्यापारी तथा नगरसेवक नबी अहेमदुल्ला यांना मदरशांकडील चामडे खरेदी करण्यास सांगितले. त्यांनी बकरी ईद काळात मदरशांकडून १२ हजार चामडे खरेदी केले. या व्यवहारात ५० ते ६० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. शहरातील पंधरा मदरश्यांना कुर्बानीचे चामडे विक्रीतून ५० लाखाला हातभार लागत होता. राज्यात प्रामुख्याने मालेगाव, औरंगाबाद, भिवंडी, परभणी, मराठवाडा, जळगाव, अक्कलकुवा, कोल्हापूर, सांगली या भागात मदरसे आहेत. दशकापुर्वी प्रामुख्याने मालेगावीच मदरसे होते. धार्मिक शिक्षण घेणारे सर्व जण मालेगावी मदरशांमध्ये शिक्षणासाठी येत. राज्यातील मदरशांमध्ये येथील शिक्षण घेतलेले तरुण होते.
 



राज्यातील पाचशेहून अधिक मदरशांना चामडे विक्रीतून दहा कोटीहून अधिक रक्कम देणगी स्वरुपात मिळत होती. घरोघरी शिवाय कत्तलखान्यात बकरी ईदच्या जनावरांची कुर्बानी केल्यानंतर चामडे मदरशांना मदत व्हावी, या हेतूने दान स्वरुपात दिले जाते. राज्यातच नव्हे तर देशातही अनेक ठिकाणी हीच पद्धत होती. यापुर्वी मोठ्या जनावराचे चामडे चारशे ते सहाशे रुपये दराने विक्री होत होते. गोवंश हत्या बंदीनंतर प्रामुख्याने म्हैस, उंट या मोठ्या जनावरांची कुर्बानी होते. म्हशीच्या चामड्याला (काला) फारशी मागणी नाही. ५० ते १०० रुपये या चामड्यातून मिळतील. त्यात हमाली, वाहतूक हा खर्च घेतल्यास फक्त २० ते २५ रुपये मदरशांना मिळू शकतील. त्या पार्श्वभूमीवर यंदा चामडे दान होणार नाही. टाकाऊ मास बरोबरच (आचरट) चामडेही कत्तलीच्या ठिकाणीच वेस्टेज म्हणून पडेल. यामुळे महापालिकांसमोर आचरट बरोबरच चामड्याची विल्हेवाट लावण्याचे आव्हान आहे. 

चामडा उद्योग दृष्टीक्षेपात

  1. गोवंश हत्याबंदी व कोरोना संसर्गामुळे चामडा उद्योगाची पिछेहाट
  2. चामडा उद्योगातील प्रमुख केंद्र असलेल्या कानपूरमधील पाचशे टेनरी बंद
  3.  देशातील चामडे उद्योतील पिछेहाटीचा चीन, बांगलादेश, व्हिएतनाम, पाकिस्तानला फायदा
  4.  शहरात ईद काळात पंचवीस हजार चामड्याची विक्री.
  5. चामडे वाहतूक, हमाली व मीठ असा प्रती चामड्यासाठी किमान साठ रुपये खर्च.
  6. म्हशीच्या चामड्याचा सध्या फक्त १०० त ११० रुपये दर
  7. चामड्यापासून हजारो वस्तुंची निर्मिती
  8.  चामडे पुरण्यासाठी महापालिकेने मैला डेपोवर खोदले १० खड्डे.
     

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com