मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजचा पर्दाफाश करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसकडून केलेल्या राज्यव्यापी आंदोलनाच्या शेवटच्या दिवशी आज (ता. 14 ऑगस्ट) भाजप कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
या वेळी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी "मोदीजी, कहॉं गये वो 20 लाख करोड?' असा जाब विचारण्यात आला. मुंबईतील कार्यालयासमोर आंदोलनास जात असताना पोलिसांनी अध्यक्ष सत्यजीत तांबे व त्यांच्या सहकाऱ्यांना ताब्यात घेतले.
मुंबईतील आंदोलनात युवक प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्याबरोबर उपाध्यक्ष ब्रिजकिशोर दत्त, विधी विभागाच्या समन्वयक करीना झेविअर आणि प्रवक्ते आनंद सिंह हेही सहभागी झाले होते.
सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून करण्यात आलेल्या या राज्यव्यापी आंदोलनात 10 ते 14 ऑगस्ट या कालावधीत युवक कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पहिल्या दिवशी गावोगावी, शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना या 20 लाख कोटींच्या पॅकेजचा काही लाभ मिळाला की नाही, याची माहिती घेतली. तसेच लघु, छोटे व मध्यम उद्योग क्षेत्रातील व्यापारी, दुकाने, कारखान्यांमध्ये जाऊन त्यांच्याशी संवाद साधला. मोदींच्या दाव्यांची वस्तुस्थिती काय आहे, हे जाणून घेतले.
नोकरदार व बेरोजगार युवकांनाही या पॅकेजबद्दल विचारले, पण कोणत्याच घटकाला या पॅकेजमधून काहीही मिळालेले नाही. विविध घटकांशी संवाद साधून युवक कॉंग्रेसचे पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी या पॅकेजची पोलखोल केली. तसेच, फोन व पत्राद्वारे सरकारला जाब विचारला आहे. या आंदोलनाला जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे युवक कॉंग्रेसकडून सांगण्यात आले.
ता. 10 ऑगस्टपासून चार दिवस शेतकरी, उद्योजक, बेरोजगार, नोकरदारांशी केलेल्या संवादानंतर आंदोलनाच्या शेवटच्या दिवशी युवक कॉंग्रेसने राज्यातील भारतीय जनता पक्षाची सर्व कार्यालये व खासदारांच्या घरासमोर जाऊन त्यांनाच 20 लाख करोड नक्की कुठे गेले अशी विचारणा केली आहे.
या आंदोलनावेळी युवक कॉंग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी सोशल डिस्टन्सिंगसह इतर सर्व अटी व नियमांचेही पालन केले.
हेही वाचा : कोरोनाने मृत्यू झालेल्या त्या ग्रामविकास अधिकाऱ्याच्या वारसाला मिळणार 50 लाख
कोल्हापूर : कर्तव्य बजावत असताना कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यू झालेल्या परभणी जिल्ह्यातील ग्रामविकास अधिकाऱ्याच्या वारसास 50 लाख रुपयांची विमा कवच रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
सुपा (ता. गंगाखेड, जि. परभणी) येथील ग्रामविकास अधिकारी रामदास आम्ले हे ग्रामस्थांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी कर्तव्य बजावत असताना त्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला. त्यात त्यांचा 3 ऑगस्ट रोजी मृत्यू झाला आहे. या अनुषंगाने संबंधीत मृत ग्रामविकास अधिकाऱ्याच्या वारसाला विमा कवच रक्कम मिळण्याबाबत परभणी जिल्हा परिषदेने राज्य सरकारला 12 ऑगस्ट रोजी प्रस्ताव सादर केला होता.
त्या प्रस्तावाला तातडीने एका दिवसात मंजुरी देऊन मृत ग्रामविकास अधिकारी यांच्या वारसास 50 लाख रुपयांची विमा कवच रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
Edited By Vijay Dudhale
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.