चिपळूण : राज्यातील भाजपचे (BJP) नेते केंद्र सरकारच्या सुरक्षा यंत्रणेचा वापर करून महाराष्ट्रातील मराठी नेते आणि उद्योगपतींना संपवण्याचे काम करत आहेत. तो त्रास मलाही होणार हे मला माहित आहे, पण मी ईडीला भीक घालत नाही. भाजपकडून जर त्रास झालाच तर मदत मागण्यासाठी मी कोणाच्या दारातही जाणार नाही, असे आमदार भास्कर जाधव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. (I am not begging ED, BJP's ploy to eliminate Marathi leaders in the state)
ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी मला तालिका समितीचे अध्यक्षपद स्विकारण्याची सूचना केली. तालिका अध्यक्षपद घेतल्यानंतर या पदाचे अधिकार, सदस्यांचा मान-सन्मान राखणे, महत्त्वाचे विषय हाताळताना नियम व शिस्त याला प्राधान्य देण्याचे मी ठरवले होते आणि यातून दिर्घकाळ आपली कामगिरी लोकांच्या लक्षात राहिली पाहिजे. असा विचार केला होता. मी विरोधी पक्षाला पुरेपूर संधी दिली होती. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण आणि इतर विधेयक मंजूर करताना विरोधी पक्षाला चर्चेत सहभागी होण्याची सूचना केली होती. विरोधी पक्षाने सभागृहातील चर्चेत भाग घेतला नाही. विधानभवनाच्या पायऱ्यांवर विधानसभा भरवली तेथे स्पीकर लावून भाषणे झाली. भाजपचे साठ आमदार विधानसभा अध्यक्षांच्या दालनात घुसले, तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की केली या साऱ्या प्रकारचे नेतृत्व माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी सभापती हरीभाऊ बागडे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील या ज्येष्ठ नेत्यांनी केले. मी पाच वेळा विधानसभेत निवडून गेलो आहे. अधिवेशनात चुकीच्या प्रथा पडता कामा नये. नव्याने येणाऱ्या सदस्यांना विधानसभेचे कामकाज समजले पाहिजे यासाठी मी आक्रमक भूमिका घेतली.
...तर 18 आमदार निलंबित केले असते
राज्य सरकारने विधान परिषदेतील नियुक्तीसाठी 12 आमदारांची यादी राज्यपालांकडे पाठवली आहे. त्याला राज्यपाल मंजूरी देत नाही म्हणून भाजपचे 12 आमदार निलंबित करून भाजपवर दबाव टाकण्याचा प्रयत्न आघाडी सरकारने केला असे विचारले असता आमदार जाधव म्हणाले, 12 आमदारांनी धक्काबुक्की केली म्हणून 12 आमदारांचे निलंबन केले. जर 18 आमदार धक्काबुक्की करताना आढळले असते तर 18 आमदारांचे निलंबन केले असते.
सभागृहातून चांगला संदेश जावा
अनेकवेळा मान-अपमानावरून गोंधळ घातला जातो. पूर्वीचा काळ वेगळा होता. विधान परिषदेत शिवसेनेचे प्रमोद नवलकर एका विषयावर चर्चा करायला उभे राहिले. तेव्हाचे सांस्कृतिक मंत्री विलासराव देशमुखांनी नवलकर यांच्या प्रश्नांची उत्तर दिले. नवलकर प्रश्न विचारायचे आणि देशमुख त्यावर उत्तर द्याचे. कोणत्याही वादाविना दिर्घकाळ ही चर्चा रंगली. अखेर जयंतराव टिळकांनी मध्यस्ती करून सामना बरोबरीत सुटला असे सांगत ही चर्चा संपुष्टात आणली. आपल्या सभागृहाचा चांगला संदेश देशात गेला पाहिजे अशी माझी अपेक्षा असल्याचे आमदार जाधव यांनी सांगितले.
हेही वाचा..
Edited By - Murlidhar Karale
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.