कोल्हापूर : 'भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांचे दोन चेहरे आहेत. या पूर्वी मी अनेकवेळा तुमचे दोन चेहरे-स्वभाव आहेत, असे जाहीर केले होते. एक तुमचा स्वभाव दिसायला मृदू, मदत करणारा, विचार न करता मुक्त वक्तव्य करणारा, प्रांजळ आहे. दुसरा स्वभाव म्हणजे मिळालेल्या सत्ता व संपत्तीच्या जोरावर विरोधकांचा काटा काढायचा, त्याला जीवनातून उठविण्याचा. याबाबत त्यांनी मुक्तचिंतन करावे,' असे प्रत्युत्तर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहे.
दोन दिवसांपूर्वीच पाटील यांनी मुश्रीफ यांना पत्र लिहिले होते. त्याला आज (ता. 6 ऑगस्ट) मुश्रीफ यांनी पत्राद्वारे प्रत्युत्तर दिले आहे. गेल्या पाच वर्षांत तुम्हाला मिळालेली सत्ता व संपत्ती याचा विचार करता दोन-तीन लाख लोकांना पाच वर्षे तुम्ही मदत कराल, याची खात्री मला आहे.
मी व माझ्या फाउंडेशनने केलेली मदत जाहीर केली, तर आपण पुन्हा ईडी, इन्कमटॅक्स माझ्या मागे लावाल. त्यामुळे मी जाहीर ते करत नाही, असा टोलाही मुश्रीफ यांनी या पत्रात लगावला आहे.
मी तुमचा शत्रू नव्हतो. वैचारिक विरोधक जरूर होतो. परंतु, मला संपवण्यासाठी केडीसीसी बॅंक, राज्य बॅंकेवर 88 ची कारवाई सुरु केली. मी सहकार क्षेत्रामध्ये राहूच नये; म्हणून दहा वर्षे पूर्वलक्षी प्रभावाने अध्यादेश काढून कायदा केलात.
फक्त मला संपवण्यासाठी राज्य सहकारी बॅंकेचे माजी संचालक म्हणून ज्यावेळी आमचे नेते अजित पवार, (कै.) फुंडकरसाहेब, आनंदराव अडसूळ, जयंतभाई पाटील इत्यादी मंडळी आपणास वरील कारवाईबाबत भेटली. आपण त्यांना आपल्या स्वभावाप्रमाणे म्हणाला, "होय, मी चौकशी लावली आहे, ती मागे घेणार नाही. त्यामध्ये मला हसन मुश्रीफ यांना अडकवायचे आहे.' यानंतर ईडी, इन्कमटॅक्स सत्र सुरू राहिले. हे मी कधीही कधीच केले नाही. पण माहिती न घेता, माझी बदनामी करण्याची संधी तुम्ही सोडत नाही, असेही या पत्रात मुश्रीफ यांनी म्हटले आहे.
ग्रामविकास विभागाने खरेदी केलेल्या आर्सेनिक अल्बम होमिओपॅथिक गोळ्या असो किंवा 15 व्या वित्त आयोगाचा निधी वाटपाबाबत मी केलेला खुलासा असो. याबाबत तुम्ही पत्रात उल्लेखच केलेला नाही. 15 व्या वित्त आयोगाच्या निधी वाटपाबाबत माझा सत्कार करण्यात आला. त्यावर मुश्रीफ कसला सत्कार करून घेत आहेत? अशी टीका केली.
याबाबत देशांमधील राज्याचे त्रिस्तरीय वाटप आदेश पाठवले. त्याबद्दल, "माझी चूक झाली, मी माहिती न घेता विधान केले होते.' याचाही साधा उल्लेखसुद्धा तुमच्या पत्रामध्ये नाही. अशी अनेक घडलेली उदाहरणे आहेत, तुमच्या दोन स्वभावाची आहेत, असेही या पत्रात म्हटले आहे.
पत्रात मुश्रीफ यांनी म्हटले आहे, चंद्रकांतदादांनी मला पाठवलेले परंतु न मिळालेले पत्र प्रसिद्धी माध्यमातून वाचले व मी आश्चर्यचकित झालो. कारण कोरोनासदृश्य संकटकाळामध्ये त्यांनी कोल्हापूरकडे पाठ फिरवली व मदत दिली नाही, असे वक्तव्य अलीकडच्या काळात मी केलेले नाही. त्यामुळे त्यांनी पत्र लिहून कोरोना संकटांमध्ये किती मदत केली ही जाहीर करण्याची संधी मिळावी; म्हणून निमित्त आहे, असे वाटते, असा टोला पत्रात लगावला आहे.
Edited By : Vijay Dudhale
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.