पंढरपूर : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अडीच महिन्यांनंतर देशभरातील धार्मिक स्थळे आणि मंदिरे उघडण्याचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केला आहे. असे असले राज्य सरकारच्या निर्णयानुसार राज्यातील मंदिरे 30 जूनपर्यंत बंदच राहणार आहेत.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आगामी आषाढी पायी पालखी सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांना 30 जूनपर्यंत प्रतिक्षा करावी लागणार आहे.
दरम्यान राज्यभरातील बहुतांश जिल्ह्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. त्यामुळे राज्यातील सर्व मंदिरे भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
केंद्र सरकारने लॉकडाउनचा 30 जूनपर्यंतचा पाचवा टप्पा जाहीर केला आहे. यामध्ये अनेक गोष्टी शिथील केल्या आहेत. त्यात रेड झोन आणि कंन्टेनमेंट झोन सोडून अन्य भागातील सर्व धार्मिक स्थळे आणि मंदिरे 8 जून नंतर सुरू करण्यास परवानगी दिली असली, तरी महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या पाहता, राज्य सरकारने मंदिरे बंद ठेवण्यास प्राधान्य दिले आहे.
देशात आणि राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर प्रथमच भाविकांना दर्शनासाठी बंद केले. यामध्ये चैत्री यात्रा, गुढी पाडवा, अक्षय तृतीया, रामनवमी यासह महिन्याची एकादशी, असे अनेक उत्सव रद्द करून साध्या पध्दतीने साजरे केले आहेत.
सुमारे अडीच महिन्याच्या प्रदीर्घ कालावधीनंतर विठुभक्तांना आता देवाच्या दर्शनाची ओढ लागली आहे. परंतु कोरोनामुळे बंद झालेले विठु माऊलीचे दर्शन कधी मिळेल, अशी आस वारकऱ्यांना लागली आहे.
गरीब भक्तांचा देव अशी विठ्ठलाची ओळख असली तरी अलीकडच्या काळात विठ्ठल मंदिर समितीच्या उत्पन्नात भरीव अशी वाढ झाली आहे. सरासरी दिवसाला मंदिर समितीला सर्व मिळून सुमारे पाच लाख रूपयांचे उत्पन्न मिळते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या 75 दिवसांपासून मंदिर दर्शनासाठी बंद आहे. बंद काळात विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सुमारे पावणे चार कोटी रूपयांचे उत्पन्न बुडाले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 17 मार्चपासून विठ्ठल-रुक्मिणी मंदिर दर्शनासाठी बंद आहे. केंद्र सरकारने 8 जूनपासून मंदिर दर्शनासाठी सुरू करण्याचा निर्णय घेतला असला तरी राज्यातील वाढता कोरोना संसर्ग पाहून राज्य सरकारने 30 जूनपर्यंत मंदिरे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या शिवाय आषाढी पालखी सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारचा पुढील आदेश येईपर्यंत मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे.
-सुनील जोशी,
कार्यकारी अधिकारी, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.