पुणे : पारनेरमधील नगरसेवकांच्या पक्षांतरावरून राज्य सरकार पणाला लागले होते का? असा प्रश्न उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांना आज (ता. 10 जुलै) पुण्यात पत्रकारांनी विचारला. त्यावर काहीसे चिडून अजित पवार म्हणाले, "हे तुम्हाला कोणी सांगितले. राज्य सरकार पणाला लागले होते, हे तुम्ही म्हणता. हे सगळे तुमच्या सुपीक डोक्यातून आले आहे,' अशा शब्दांत त्यांनी आपला त्रागा व्यक्त केला.
उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुण्यात होते. त्यांनी पुण्यातील कोरोनाच्या सद्यस्थितीचा आढावा घेऊन वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन पुणे, पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या क्षेत्रात पुन्हा लॉकडाउन जाहीर करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर ते पत्रकारांना लॉकडाउनसंदर्भात माहिती देत होते. त्या वेळी त्यांना नगर जिल्ह्यातील पारनेरमधील शिवसेना नगरसेवकांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील प्रवेश आणि त्यानंतर त्यांचे पुन्हा शिवसेनेत जाणे याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता.
पारनेरमधील शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी आमदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली बारामतीत जाऊन अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रसमध्ये प्रवेश केला होता. त्यावरून शिवसेना-राष्ट्रवादीत तणाव निर्माण झाला होता. परंतु शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या यशस्वी शिष्टाईनंतर त्या नगरसेवकांना शिवसेनेकडे पाठविण्यात आले होते.
त्यावर पुण्यात पत्रकारांनी अजित पवारांना, "पारनेर नगरसेवकांच्या पक्षांतरावरून राष्ट्रवादी-शिवसेनेत आम्ही तुमच्याशी बोलणार नाही, असं काही झालं होतं का? आणि केवळ पाच नगरसेवकांवरून राज्य सरकार पणाला लागले होते का?' असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर काहीसे चिडून पवार म्हणाले की, "हे तुम्हाला कोणी सांगितले. राज्य सरकार पणाला लागले होते, असे तुम्ही म्हणता. हे सर्व तुमच्या सुपीक डोक्यातून आलेले आहे. असा काहीही प्रकार झाला नव्हता.'
ते पुढे म्हणाले की "कुठलीही आघाडी, युती चालवत असताना त्यातील सहभागी पक्षाची माणसं एकमेकांकडे घेतल्यास त्याचा परिणाम आघाडीवर अथवा युतीवर होतो. त्यामुळे आम्ही त्याबाबतचा निर्णय घेतला. काम करत असताना एखादी गोष्ट नजरचुकीने होत असते. लक्षात आल्यानंतर ती चूक दुरुस्ती करायची असते. तशा पद्धतीने ते झाले आहे.'
पुणे : पुणे शहर, पिंपरी-चिंचवड या दोन पोलिस आयुक्तालयातील संपूर्ण हद्दीसह या शहरांजवळील चाकण, वाघोली, हिंजवडी या भागांत येत्या 13 जुलैपासून दहा दिवसांसाठी 23 जुलैपर्य़ंत लाॅकडाऊनची घोषणा आज करण्यात आली. फक्त अत्यावश्यक सेवा या कालावधीत सुरू राहणार आहेत. कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. ही साखळी ब्रेक झाल्यानंतर कोरोनाच्या वाढीचा वेग कमी करण्यासाठी या लाॅकडाऊनचा उपयोग होणार आहे.
या दोन्ही शहरांत कोरोनाच्या केसेस वाढल्याने हा निर्णय घेतल्याचे जाहीर करण्यात आले. पुढील दोन दिवस जनतेला पूर्वतयारीसाठी देण्यात आले आहेत. दूध, औषधे, भाजीपाला इतक्याच बाबी लाॅकडाऊन काळात सुरू राहणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबतचा आढावा आज बैठकीत घेतल्यानंतर त्याची घोषणा करण्यात आली.
Edited By : Vijay Dudhale
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.