चंद्रकांत पाटील झोपेत बोलले की जागे असताना? : अजित पवारांनी उडवली खिल्ली 

त्यामुळे सततपुडी सोडण्याचे काम पाटील करतात.
Ajit Pawar scoffed at Chandrakant Patil who predicted the fall of the Mahavikas Aghadi government :
Ajit Pawar scoffed at Chandrakant Patil who predicted the fall of the Mahavikas Aghadi government :

बारामती : महाविकास आघाडी सरकार रात्रीतच कोसळेल, असा दावा करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खिल्ली उडवत चंद्रकांत पाटील हे झोपेत असताना बोलले की जागे असताना असा खोचक सवाल केला आहे

ज्या दिवसापासून महाविकास आघाडीचे सरकार आले, त्या दिवसापासून त्यांना असह्य झालं आहे. त्यांना आपण सरकारमध्ये नाही, ही सतत बोचणी लागून राहिली आहे. आपल्या सगळ्यात जास्त जागा येऊनही आपण सरकारमध्ये नाही, त्या मानसिकतेतून ते बाहेरच यायला तयार नाहीत, त्यांच्या कार्यकर्त्यांनी इकडे तिकडे जाऊ नये, त्यामुळे सतत पुडी सोडण्याचे काम पाटील करतात. जोवर सोनिया गांधी, शरद पवार व उद्धव ठाकरे एकत्र आहेत, तोवर महाविकास आघाडी सरकारला काहीही धोका नाही, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला.  (Ajit Pawar scoffed at Chandrakant Patil who predicted the fall of the Mahavikas Aghadi government)

बारामतीत आज (ता. २९ मे) आढावा बैठकीनंतर पवार माध्यमांशी बोलत होते. मराठा आरक्षणासंदर्भात छत्रपती संभाजीराजे यांनी विविध मान्यवरांच्या भेटी घेतल्या आहेत. त्या बाबत पवार म्हणाले, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला कोणालाही भेटण्याचा आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे. मराठा आरक्षणानंतर राज्य सरकारनेही इतर कोणत्याही वर्गाला धक्का न लागता मराठा आरक्षण मिळाल पाहिजे म्हणून जी काही खबरदारी घ्यायला पाहिजे, तशी खबरदारी राज्य सरकार घेत आहे. त्यात न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे, तेही त्याचा अभ्यास करत आहेत. अशोक चव्हाण हेही अभ्यास करीत आहेत. 

सरकार सर्वच जातीधर्माच्या लोकांना न्याय देण्यासाठी सकारात्मक आहे, यातून मार्ग काढण्याचा आमचा प्रयत्न सुरु आहे. छत्रपती संभाजीराजेही तोच प्रयत्न करीत आहेत, असा प्रयत्न करणारे जे मान्यवर असतील, त्याच्यात राजकारण न आणता त्या वर्गाला न्याय देण्याकरीता ज्यांची मानसिकता आहे अशा मान्यवरांसोबत सरकार आहे, अशी ग्वाही अजित पवारांनी दिली. 

कोरोनावर मात करण्याच्या उपाय योजनांना राज्य सरकारने सर्वोच्च प्राधान्य दिलेले आहे. तिसरी लाट येणार या बाबतही चर्चा सुरु आहे. लहान मुलांना या संकटापासून दूर ठेवण्यासाठी सर्वतोपरी तयारी करण्याचे नियोजन केलेले आहे. ऑक्सिजनबाबत स्वयंपूर्ण होण्याबाबतही राज्य सरकारने प्रयत्न केलेले आहेत. रुग्णवाहिकांची संख्या वाढवण्यासह मुलभूत सुविधांसाठी निधीही उपलब्ध करुन दिला आहे, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नमूद केले.

लसीकरणाचा कार्यक्रम सरकारला तातडीने व मोठ्या प्रमाणावर राबवायचा आहे, या कामासाठी साडेसहा हजार कोटी रुपयांची तरतूदही सरकारने केली आहे, मात्र दुर्देवाने देशात ज्या कंपन्या लस तयार करतात, त्यांच्याकडून तेवढ्या मोठ्या प्रमाणावर पुरवठा होत नाही; म्हणून मोफत लसीकरण कार्यक्रमाला अडचणी येत आहे. या मध्ये आम्ही केंद्राला विनंती केली आहे की परदेशातील ज्या मान्यताप्राप्त लशी आहेत, अशा लशी भारतात आणणे व लोकांना देण्याची परवानगी द्यावी, असेही त्यांनी सांगितले. 

अजित पवार म्हणाले की, कृषीपूरक दुकाने उघडण्याची सरकारने परवानगी दिली आहे. शेतकऱ्यांना अडचणी येऊ नये, याची काळजी आम्ही घेत आहोत. कोरोनाकाळात आपला विकासदर कृषी क्षेत्राने सांभाळण्याचेच काम केले आहे. यंदा पाऊस चांगला आहे, असे हवामान खात्याने सांगितले आहे. सर्व शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत शून्य टक्के व्याजदराने कर्जही उपलब्ध करुन देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com