पिंपरी:बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची भूमिका केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री गिरीराज सिंह आणि पशुसंवर्धन खात्याचे सहसचिव ओ. पी. चौधरी यांनी काल दिल्लीत झालेल्या बैठकीत दिल्याची माहिती खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज दिली.यामुळे बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
दरम्यान,बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठेपर्यंत स्वस्थ बसणार नसल्याचे खासदार डॉ. कोल्हेंनी सरकारनामाला सांगितले.ही शर्यत पुन्हा सुरू झाली, तर फक्त या शर्यतीकरिताच वापरल्या जात असलेल्या व ती बंद झाल्याने नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या खिलार जातीच्या देशी बैलाच्या वंशाला जीवदान मिळेल,असे ते म्हणाले.
बैलाचा समावेश हा केंद्रीय पशुसंवर्धन मंत्रालयाने संरक्षित प्राण्यांच्या यादीत केला आहे. त्यामुळे प्राणीप्रेमींच्या याचिकेवर बैलगाडा शर्यतीवर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. या यादीतून बैलाला वगळले, तर पुन्हा बैलगाडा शर्यत सुरू हैऊ शकते. म्हणून या यादीतून बैलाला.वगळण्याची मागणी खा.कोल्हे यांनी परवा गिरीराज सिंह यांच्याकडे केली होती.
त्यावेळी आपल्याला याबाबत चुकीची माहिती दिल्याचे श्री. गिरीराज सिंह सांगून या संदर्भात गुरुवारी बैठक घेण्याचे आश्वासन देत सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्यानुसार काल गिरीराज सिंह, चौधरी आणि डॉ कोल्हे यांची बैठक झाली.यावेळी डॉ. कोल्हे यांनी बैलगाडा शर्यती हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा पारंपरिक खेळ असून दरवर्षी होणाऱ्या ग्रामदैवतांच्या यात्रोत्सवात नवसाचे बैलगाडे पळविण्याची प्रथा असल्याचे निदर्शनास आणले. त्याचबरोबर गावोगावच्या यात्रा-उत्सवांच्या निमित्ताने शेती अवजारांपासून ते विविध प्रकारच्या जीवनावश्यक वस्तु, कपडे, मिठाई, धान्य आदींची मोठी उलाढाल होते. सांस्कृतिक कार्यक्रम, वाजंत्री या सारख्या कलावंतांची उपजिवीका या यात्रा-उत्सवांवर अवलंबून असते. मात्र बैलगाडा शर्यतबंदीमुळे हा सर्व व्यापार ठप्प झाला असून व्यापारी, कलावंत व बलुतेदार यांच्या उपजिवीकेचा प्रश्न गंभीर बनला आहे," याकडे लक्ष वेधले.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, बैलगाडा शर्यतीसाठीचा खिलार जातीच्या देशी बैलांचा वापर शेतीकामासाठी केला जात नाही. त्यामुळे बैलगाडा शर्यती बंद झाल्याने खिलार जातीच्या देशी बैलांचा सांभाळ करणे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. परिणामी या बैलांची कमी दराने विक्री होऊन त्यांची रवानगी अनधिकृतपणे कत्तलखान्यात होत आहे. या सर्वांचा एकत्रित परिणाम होऊन खिलार जातीच्या देशी बैलांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असून गेल्या काही वर्षांतील बैलांच्या संख्येतील घट पाहता पुढील काही वर्षांत हा खिलार जातीच्या देशी बैलांचा वंश नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे अशी भूमिका खासदार डॉ. कोल्हे यांनी ठासून मांडली.ही भूमिका उचलून धरत ही बंदी उठवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचै आश्वासन मंत्र्यांनी दिले.
Edited By - Amit Golwalkar

