उद्धवा, दारू नको भक्तीचे दार उघड; बावनकुळेंचा कोराडी मंदिरासमोर घंटानाद

महाराष्ट्रातील देवस्थाने, धार्मिक स्थळे खुली करण्याची मागणी सातत्याने होते आहे. केंद्र सरकारनेही ४ जून रोजी नियमावलीसह परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार देशभरातील बहुसंख्य प्रमुख देवस्थाने सुरू झालेली आहेत. राज्यातही सामाजिक अंतर पाळून आवश्यक नियम, अटी शर्तीसह देवस्थाने, धार्मिक स्थळे सुरू करण्याची तसेच भजन, कीर्तन व पूजन करण्याची आग्रही मागणी भाविकांकडून होते आहे.
Bawankule Ghantanad
Bawankule Ghantanad

नागपूर : राज्यातील देवस्थाने, धार्मिक स्थळे सरकारने सुरू करावी, यासाठी राज्याचे माजी ऊर्जामंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेश महामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोराडीच्या जगदंबा मंदिरासमोर घंटानाद आंदोलन केले. शहरात आमदार प्रवीण दटके यांच्या नेतृत्वात वर्धा मार्गावरील साई मंदिरासमोर हे आंदोलन करण्यात आले. 

देशातील बहुतांश मंदिरे केंद्र सरकारच्या सूचनेनंतर उघडण्यात आली आहे. पण राज्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दबावाखाली मुख्यमंत्र्यांनी अद्याप मंदिरे उघडण्याला परवानगी दिली नसल्याचा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. सरकारने जनतेला देवाच्या दर्शनापासून दूर ठेवले आहे. दारूच्या दुकानांमध्ये मंदिरांपेक्षाही जास्त गर्दी होत आहे. त्याकडे सरकारचे लक्ष नाही, पण मंदिरात जाणारे भक्त सोशल डिस्टंसिंग, मास्क यांसह सर्व नियमांचे पालन करण्यास तयार असतानासुद्धा त्यांना मंदिरात जाण्यास मज्जाव करण्यात येत आहे. यामागचे कारण तरी सरकारने स्पष्ट करावे, अशी मागणीही बावनकुळे यांनी केली आहे. 

 
दार उघड उद्धवा दार उघड, दारू नको भक्तीचे दार उघड, मदिरा चालू मंदिर बंद, उद्धवा तुझा कारभारच धुंद, भक्तांना जेल, गुन्हेगारांना बेल, अशा घोषणा देऊन भाजपच्या कार्यकर्यांनी मंदिराचा परिसर दणाणून सोडला. संत, महंत, आचार्य, धर्माचार्य, धार्मिक, अध्यात्मिक व सांप्रदायिक क्षेत्रातील मंडळी तसेच देवस्थाने, तीर्थक्षेत्रे यांवर ज्यांचा उदरनिर्वाह निगडीत आहे, ते सर्व या आंदोलनात सहभागी झाले होते. सामाजिक अंतर आणि नियमांसह राज्यातील देवस्थाने, धार्मिक स्थळे सुरू करून भजन कीर्तन व पूजनास परवानगी मिळावी, या मागणीकडे निद्रिस्त ठाकरे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.  

कोरोना प्रादुर्भावाच्या काळात जनजीवन पूर्ववत करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने राज्यातील मॉल, मांस, मदिरा पुनःश्च हरी ओम'च्या नावाखाली सर्व काही चालू केले. मात्र संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात ‘हरी’ ला मात्र बंदिस्त ठेवले आहे. संतभूमी महाराष्ट्रात मद्य मुबलक सुरू आहे आणि भजन पूजन करणाऱ्या भक्तांवर गुन्हे दाखल दाखल होत आहेत. भाविक भक्तांना जेल, गुन्हेगारांना बेल, असा ठाकरे सरकारचा कारभार सुरू असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. 

महाराष्ट्रातील देवस्थाने, धार्मिक स्थळे खुली करण्याची मागणी सातत्याने होते आहे. केंद्र सरकारनेही ४ जून रोजी नियमावलीसह परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार देशभरातील बहुसंख्य प्रमुख देवस्थाने सुरू झालेली आहेत. राज्यातही सामाजिक अंतर पाळून आवश्यक नियम, अटी शर्तीसह देवस्थाने, धार्मिक स्थळे सुरू करण्याची तसेच भजन, कीर्तन व पूजन करण्याची आग्रही मागणी भाविकांकडून होते आहे. आता भक्तांची ही मागणी सरकारने लवकर पूर्ण करावी, अन्यथा आंदोलनाचे स्वरूप तीव्र करणार असल्याचे सांगण्यात आले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com