कोरोनाची तिसरी लाट येणार नाही, याची ग्वाही विखे पाटलांनी द्यावी - अब्दुल सत्तार

विखे पाटलांनी मंदिरे मशिदी उघडण्याचा आग्रह धरला. परंतु सत्तार यांनी या मताशी असहमती दर्शवून सध्या धार्मिक ठिकाणे उघडणे कसे अशक्य असल्याचेसांगितले.
sattar vikhe.jpg
sattar vikhe.jpg

कोल्हार : भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी 30 ऑगस्टला कोल्हार येथील भगवती माता मंदिरा समोर राज्यातील मंदिरे खुले करण्यासाठी शंखनाद आंदोलन केले होते. यावेळी विखेंनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली होती.

कोल्हार येथील जिल्हा परिषदेच्या येथील प्राथमिक शाळेच्या बीओटी तत्त्वावर बांधण्यात येणाऱ्या शाळा इमारत व व्यापारी संकुलाच्या इमारतीच्या भूमिपूजन समारंभाच्या निमित्ताने राज्याचे ग्रामविकास तथा महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार व आमदार राधाकृष्ण विखे पाटील एका व्यासपीठावर आले होते.

हेही वाचा...

त्या दोघांचे एकमेकांशी मैत्री आहे. मात्र मैत्रीचे धागे जोडतानाच सर्वच गोष्टींत परस्परांशी एकमत नसल्याचे दाखवून दिले. यावेळी विखे पाटलांनी मंदिरे मशिदी उघडण्याचा आग्रह धरला. परंतु सत्तार यांनी या मताशी असहमती दर्शवून सध्या धार्मिक ठिकाणे उघडणे कसे अशक्य असल्याचे सांगितले. 

सत्तार म्हणाले, धार्मिक स्थळे उघडताना कोरोनाची तिसरी लाट येणार नाही. याची ग्वाही विखे पाटलांनी द्यावी. मंदिरे उघडण्याबाबतचा त्यांचा संदेश मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवील. वास्तविक उद्धवजींशी विखेंचे माझ्यापेक्षा जास्त संबंध आहेत. 'तुम्हारे खत मे मेरा सलाम' अशी टीप्पणी सत्तार यांनी करताच एकच हशा पिकला.

मंदिरे मशिदी उघडण्याबाबतच्या विषयाचे राजकारण होऊ नये,अशी अपेक्षा व्यक्त करून सत्तार यांनी व्यक्त केली. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेविषयी जागतिक आरोग्य संघटनेने दिलेला इशारा तसेच केरळ व नागपूरला शिरकाव केलेल्या तिसऱ्या लाटेकडे विखे-पाटलांचे लक्ष सत्तार यांनी वेधले. 

हेही वाचा...

या दोन्ही दिग्गज नेत्यांनी राजकारण विरहित जपलेल्या मैत्रीपूर्ण संबंधांची मार्मिकपणे उदाहरणे दिली. सत्तार म्हणाले, खासदार बाळासाहेब विखे व राधाकृष्ण विखे पाटील यांनी माझ्या 25 वर्षांच्या राजकारणात मला सर्वाधिक हिम्मत व पाठबळ दिले. सिल्लोड मतदारसंघात 2009 मध्ये झालेल्या माझ्या निवडणुकीत बाळासाहेब विखे पाटलांनी अभ्यासपूर्ण मांडलेला राज्याचा पाणीप्रश्न आजही आठवणीत आहे. 

युतीची मैत्री तुटली असली तरी आमची 25 वर्षांची मैत्री अभेद्य आहे. विखेपाटील 17 आमदारांच्या आतल्या गाठीचे नेते आहेत. असे सत्तार म्हणाले. 

राधाकृष्ण विखे पाटील यांनी सत्तार यांच्याविषयी म्हणाले, सत्तार हे ग्रामीण भागाची जाण असलेले नेते आहेत. औरंगाबाद हा दुष्काळी भाग सांभाळताना त्यांनी स्वतःला झोकून दिले. सत्तार यांनी त्यांच्या सिल्लोड मतदारसंघाचा कायापालट करण्याचा विडा उचलला आहे. माझ्याशी त्यांनी राजकारणापलीकडे मैत्री जपली. मैत्रीचा आदर म्हणूनच ते आज येथे आले. 

हेही वाचा...

राजकारणात कोत्या मनाचे लोक आहेत. गुदगुल्या करून हसायला लावणारे काही मंत्री सुध्दा आमच्या जिल्ह्यात आहेत, असा टोला विखे पाटलांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता लगावला. 

स्तुती सुमने व अतुट मैत्री 
विद्यमान मंत्री अब्दुल सत्तार व शिवसेनेचे मंत्रीपद भूषविलेले आमदार राधाकृष्ण विखे पाटील या शिवसेनेच्या आजीमाजी मंत्र्यांनी एकमेकांमधील अतुट मैत्रीची विण घट्ट करतानाच परस्परांवर स्तुतिसुमने उधळली. दोघेही नेते तसे पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे पण सध्याच्या आपल्या पक्षात येण्याचे एकमेकांना निमंत्रण दिल्याचे दोघांनी जाहीरपणे सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com