यवतमाळ : एसटी महामंडळात सरळ सेवा भरतीने गेल्यावर्षी सेवेत सामावून घेतलेल्या राज्यातील जवळपास साडेतीन हजार पेक्षा अधिक कर्मचार्यांची सेवा तात्पुरत्या खंडीत करण्यात आली होती. या निर्णयाने एसटी महामंडळात एकच खळबळ उडाली होती. मात्र, आता एसटी महामंडळांने स्थगित केलेल्या कर्मचार्यांची सेवा पुवर्वत करण्याचा निर्णय घेतला असून राज्यातील साडेतीन हजार कर्मचार्यांना ‘बाप्पा’पावला आहे.
कोरोनाच्या महामारीमुळे २३ मार्चपासून एस. टी. बस सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या निर्णयामुळे एस.टीचे दरमहा कोट्यवधी रुपयाचे उत्पन्न बुडत आहे. एसटीने आर्थिक परिस्थितीमुळे मे महिन्यात कर्मचार्यांना केवळ ५० टक्केच वेतन दिले. २०१९ मध्ये सरळ सेवेने राज्यात जवळपास आठ हजार पदे भरण्याचा निर्णय घेतला होता. त्यापैकी ४५०० पदांची भरती करण्यात आली. यातील अनेक उमेदवारांचे सध्या प्रशिक्षण सुरु आहे. कोरोनामुळे एसटी अडचणीत सापडली आहे.
सध्या प्रवाशी सेवा ठप्प आहे. केवळ जिल्हा अंतर्गत सेवा सुरु आहे. यातही प्रवाशांची पाठ एसटी कडे आहे. पुन्हा वाहतूक सुरु होण्यासाठी मोठा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळेच सरळ सेवा भरतीने २०१९ मधील चालक तथा वाहक पदांमध्ये नेमणुका देण्यात आलेल्या कर्मचार्यांच्या सेवा तात्पुरत्या स्वरुपात खंडीत करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला होता. यात साडेतीन हजारापेक्षा जास्त कर्मचार्यांचा समावेश होता.
लॉकडाऊनमुळे आधीच अडचणीत असलेल्या एसटी कर्मचार्यांसमोर उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. या निर्णयामुळे कामगारामध्ये असंतोष दिसून आला. संघटनांनी या निर्णयाबाबत आवाज उठविला. त्यामुळे फेरविचार करण्यात आला. परिणामी आता एसटी महामंडळांचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी गुरुवार (ता.तीन) सरळसेवा भरती २०१९ अतंर्गत चालक तथा वाहक पदामध्ये नेमणूक देण्यात आलेल्या कर्मचार्यांच्या सेवेस देण्यात आलेली तात्पुरती स्थगीती उठविली आहे.
या निर्णयामुळे साडेतन हजारापेक्षा जास्त कर्मचार्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कर्मचार्यांची सेवा तात्पुरती स्थगीत केल्यानंतर परिवहनमंत्री अॅड.अनिल परब यांनीही कोणाचेही नुकसान होणार नसल्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार नवे आदेश निर्गमीत झाले आहेत. या निर्णयामुळे एसटी कर्मचार्यांना बाप्पा पावल्याचे दिसत आहे.
२०१९ मध्ये चालक तथा वाहक पदाची भरती करताना एसटी महामंडळास आवश्यक असलेल्या जागेवरच जाहीरात काढून भरती करण्यात आलेली आहे. सेवा तात्पुरती खंडित करण्याचा निर्णय अन्यायकारक होता. संघटना तसेच कामगारांच्या लढ्यामुळे हा निर्णय बदलण्यात आला. त्यामुळे आनंदच आहे. मात्र, प्रशिक्षण थांबवलेल्या फक्त अनुकंपा तत्वावरच्याच कर्मचार्यांचे प्रशिक्षण सुरू करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. इतरांवर त्यामुळे अन्याय होणार आहे. इतिहासांत पहिल्यांदा महीला चालक तथा वाहक कर्मचारी प्रशिक्षण घेत होते तसेच इतरही पदांचे प्रशिक्षण थांबलेले आहे. त्यांना पुर्ववत प्रशिक्षण देऊन सेवेत घ्यावे अशी मागणी आम्ही केली आहे व त्यांना न्याय मिळवूनच देऊ
-संदीप शिंदे, राज्य अध्यक्ष, एसटी कामगार संघटना,
Edited By - Amit Golwalkar
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.