'या' अटींवर घेता येणार आता राज्यात ग्रामसभा
बारामती : कोरोनाच्या निर्बंधात सर्वच स्तरावर शिथीलता येत असल्याने राज्याच्या ग्रामविकास विभागाने सोशल डिस्टन्सिंग व कोरोनाच्या बाबत आरोग्य विभागाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करुन ग्रामसभा घेण्यास परवानगी दिली आहे.
ग्रामविकासात ग्रामपंचायतीच्या ग्रामसभांना असलेले अनन्यसाधारण महत्व लक्षात घेता ग्रामसभांचे पूर्वीप्रमाणे आयोजन होणे गरजेचे आहे, त्या मुळेच राज्य शासनाने ग्रामसभांचे आयोजन करण्यास परवानगी दिली आहे. राज्याच्या अनेक भागात उद्या नवीन कारभारी ग्रामपंचायतींचा कारभार हाती घेणार आहेत, या पार्श्वभूमीवर शासनाने ग्रामसभांच्या आयोजनाला दिलेल्या परवानगीचे महत्व वेगळे आहे.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम सात नुसार प्रत्येक वित्तीय वर्षात किमान चार ग्रामसभांचे आयोजन बंधनकारक आहे. असे आयोजन न झाल्यास संबंधित सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक यांना जबाबदार धरुन त्यांच्याविरुध्द कारवाईची तरतूद आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने सामाजिक, राजकीय सभा व संमेलनांवर बंदी आणली होती. ग्रामसभेतही ग्रामस्थांची उपस्थिती व त्या मुळे निर्माण होणारी गर्दी कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या दृष्टीने अयोग्य असल्याने ग्रामसभांना तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असून स्थिती पूर्ववत होत असल्याने सोशल डिस्टन्सिंगसह इतर मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करुन ग्रामसभा घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. राज्य शासनाचे उपसचिव ए.का. गागरे यांनी या बाबतची शासकीय अधिसूचना जारी केली आहे.
Edited By - Amit Golwalkar
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.