गडहिंग्लज : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कायम चुकीचेच मुहूर्त काढत आहेत, असा टोला ग्राम विकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी लगावला. त्यांना नेमकं काय झालंय, हेच समजत नाही, असेही ते म्हणाले.
कोरोनाच्या अनुषंगाने गडहिंग्लज (जि. कोल्हापूर) येथे आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, ""भाजपचे दूध दरासाठीचे आंदोलन योग्य आहे. दुधाला दर मिळालाच पाहिजे; परंतु आंदोलनासाठी त्यांनी काढलेला मुहूर्त चुकीचा आहे. शासकीय सुटीच्या दिवशी व बकरी ईद असताना आंदोलन पुकारले आहे. अशा परिस्थितीत त्यांच्याकडे कोण लक्ष देणार?
"देवेंद्र फडणवीसांना अलीकडे काय झालंय हेच समजत नाही. त्यांनी काढलेला मुहूर्त नेहमीच चुकीचा ठरत आहे. गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिनी अभीष्टचिंतन करण्याचे सोडून फडणवीसांनी भाजप कार्यकारिणीची बैठक घेत त्यांना अपशकून केला. या बैठकीत बेईमान म्हणत टीका केली होती, महाराष्ट्राची ही संस्कृती नाही. ही कुठली संस्कृती?, असा सवालही त्यांनी या वेळी उपस्थित केला.
ग्रामविकास मंत्री मुश्रीफ म्हणाले की, गडहिंग्लज नगरपालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांना निधी कमी मिळाल्याने एक कोटीचा निधी तत्काळ देणार आहे. या माध्यमातून ते नगरसेवक आपापल्या प्रभागांमधील विकासकामांवर निधी खर्च करतील. सध्या कोविड रुग्णांची संख्या वाढत आहे.
""उपजिल्हा रुग्णालय कोविड रुग्णालय म्हणून घोषित केले आहे. वास्तविक यापूर्वीच हे रुग्णालय कोविडसाठी राखीव ठेवणे आवश्यक होते. त्यावेळी झालेली चूक आता सुधारली आहे. सरकारी दवाखान्यांत फिजिशियन नसल्याने अडचण येत आहे. आता ऑन कॉलवरील फिजिशियनशी संपर्क साधून उपचारासाठी आवाहन करण्यात येत आहे. खासगी डॉक्टरांनी इतर आजारांवरील रुग्णांवर उपचार करावेत. लक्षणे दिसणाऱ्यांची नावे तत्काळ सरकारी यंत्रणेकडे द्यावीत; परंतु इतर आजारांवरील उपचार करणे त्यांनी थांबवू नयेत, असे आवाहनही मुश्रीफ यांनी या वेळी केले.
हेही वाचा : उद्धव ठाकरे स्वयंघोषित नव्हे; जनतेने निवडलेले मुख्यमंत्री
मुंबई : "उद्धव ठाकरे हे स्वयंघोषित मुख्यमंत्री नसून त्यांना महाराष्ट्रातील जनतेने मुख्यमंत्रिपदी बसवले आहे,' असे प्रतित्त्युर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिले.
ठाकरे सरकारमध्ये काही स्वयंघोषित मुख्यमंत्री आहेत, हे सरकार अंतर्विरोधाने पडेल, असा दावा माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात केला होता.
त्याबाबत विचारले असता मंत्री पाटील यांनी वरील उत्तर दिले. ते म्हणाले की उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री आहेत आणि मुख्यमंत्र्यांनीच निर्णय घ्यायचे असतात. त्यानुसार ठाकरे हे राज्यातील संपूर्ण जिल्ह्याचा, शहराचा आढावा घेत असतात आणि तेच निर्णय घेत आहेत.
Edited By Vijay Dudhale
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.