सिंधुदुर्ग :मुख्यमंत्री फक्त घोषणा करतात. प्रत्यक्ष निर्णयांची अंमलबजावणी होत नाही. शेतकऱ्यांना योग्य ते बियाणे पुरवण्याची जबाबदारी महामंडळाची आहे. त्यावर सरकारचे नियंत्रण नाही. कृषी मंत्री छापे टाकतात हा केवळ देखावा आहे, अशी जोरदार टिका विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज येथे केली.
सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर असताना पत्रकारांशी बोलताना दरेकर यांनी सरकारवर टीका केली. शेतकऱ्यांना बोगस बियाणे मिळाल्याने पीक उगवले नाही. आता ते पुरवणाऱ्यांवर कारवाई करुन काय साधले जाणार आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
आपण पंढरपूरला आषाढीच्या दिवशी जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आज जाहीर केले आहे. त्याबाबत बोलताना दरेकर म्हणाले, "पंढरपूरच्या विठूरायला साकडं घालायला कोणाला बंदी नाही. परमेश्वर सर्वांचा आहे. साकडं घालावं की नाही घालावं, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील जनता वेगवेगळ्या विषयांवर होरपळत असतानाच त्यांना सुख आणि समाधान देण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे. तसे झाले तरच ते साकडं खऱ्या अर्थाने पोचणार आहे. लोकांचे आर्थिकदृष्ट्या कंबरडे मोडले असेल, उद्योग धंदं बंद असतील तर असे साकडे कामाचे नाही''
"एक जुलै नंतर लॉकडाउन उठणार नाही. पण हळूहळू सर्व शिथिल होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले होते. सरकार मनाला वाटेल त्यावेळी लॉकडाउन उठवतंय. मनाला वाटेल त्यावेळी व्यवहार बंद करतंय. सरकारने या पद्धतीने जनतेच्या जीवाशी खेळू नये," असेही दरेकर म्हणाले.
सत्तेवर असलेल्या तिन्ही पक्षामध्ये फारसं नीट चाललेले नाही. त्यामुळे नाराजी बाहेर येत आहे. मोठ्या विषयावर अंतर्गत वाद आहेत. तीन विचारसरणींचे हे सरकार फार काळ टिकणार नाही, असेही दरेकर यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.