पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यातील सहा साखर कारखान्यांकडे मागील हंगामील एफआरपीची जवळपास सहा कोटी रूपयांची थकबाकी आहे. थकबाकी मिळावी यासाठी शेतकरी संघटनांनी आंदोलन पुकारले आहे. तरी ही साखर कारखानदार दाद देत नाहीत. अशातच पंढरपूर तालुक्यातील सुस्ते येथील विशाल चव्हाण या शेतकऱ्याने भाजप नेते कल्याणराव काळे यांच्या कारखान्याची तक्रार थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडेच केली आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करा, असा सल्ला संबंधीत शेतकऱ्याला दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
शेतकरी विशाल चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील संवादाची ऑडीओ क्लीप सोशल मिडीयात व्हायरल झाली आहे. संवादामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी थेट काळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा सल्ला दिल्याने सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
आठ दिवसापूर्वी शरद पवार पंढरपूर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी पवारांनी आमदार भारत भालके यांच्या निवासस्थानी भेट नाकारल्याने काळे नाराज होऊन परत गेले होते. त्यानंतर काळेंची नाराजी दूर करण्यासाठी कल्याणराव काळे भाजपत असले तरी आम्ही विठ्ठल परिवार म्हणून एकच आहोत, असे सांगत कालच आमदार भारत भालके यांनी सारवासारव केली होती.
त्यानंतर दुसऱ्याच दिवशी काळेंच्या कारखान्या विरोधात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी थेट गुन्हा दाखल करण्याची सल्ला संबंधित शेतकऱ्यांना सूचना केल्याने काळेंच्या समोर अडचणी वाढल्या आहेत. सध्या सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्याचा ऊस गाळप हंगामाची तयारी सुरू आहे. अनेक कारखान्यांचे बाॅयलर अग्नी प्रदिपन कार्यक्रम संपन्न झाले आहेत. अशातच थकीत 'एफआरपी' च्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाल्याने वाद आणखी पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
Edited By - Amit Golwalkar
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.