महाराष्ट्र व कर्नाटक जलसंपदा मंत्र्यांमध्ये पूरस्थितीबाबत आज मुंबईत बैठक
बेळगाव/गोकाक : महाराष्ट्र व कर्नाटक या राज्यांमधील संभाव्य पूरस्थिती संदर्भात चर्चा करण्यासाठी दोन्ही राज्यांच्या जलसंपदा मंत्र्यांची महत्त्वाची बैठक आज (ता. 8) मुंबईत होणार आहे. कर्नाटकच्या जलसंपदा खात्याने ही माहिती दिली आहे. महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील व कर्नाटकचे मंत्री रमेश जारकीहोळी या बैठकीत सहभागी होणार आहेत.
विशेष म्हणजे गेल्या पावसाळ्यात या दोन्ही नेत्यांच्या जिल्ह्यातच महापूर आला होता. जयंत पाटील यांचा जिल्हा सांगली आहे. सांगली जिल्ह्याने गेल्या वर्षी महापुराची विदारक स्थिती अनुभवली आहे. बेळगाव जिल्ह्यालाही महापुराचा फटका बसला होते. यंदाही पावसाचे प्रमाण जास्त असेल, असे हवामान खात्याने जाहीर केल्यामुळे आधीच उपाययोजना करण्याच्या दृष्टीने संभाव्य पूरस्थितीबाबत चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या बैठकीत महापुराचे नियंत्रण, त्यासाठी आवश्यक उपाययोजना याबाबत चर्चा केली जाणार आहे. कृष्णा व भीमा या दोन नद्यांच्या पुराबाबत या बैठकीत प्रामुख्याने चर्चा होईल. या दोन्ही नद्यांवर असलेल्या धरणांमधील पाण्याची पातळी, पावसाचे प्रमाण वाढल्यानंतर धरणांमधून करावा लागणारा विसर्ग, त्यासाठी दोन्ही राज्याच्या जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये असावा लागणारा समन्वय या विषयांवरही चर्चा केली जाणार आहे.
दरवर्षी उन्हाळ्यात कर्नाटकात कृष्णा नदीकाठावर पाणी टंचाईची स्थिती उद्भवते. त्याचवेळी कर्नाटकाकडून पाण्याची मागणी होते. कृष्णा पाणीवाटपाबाबत लवादाचा निर्णयही आहे. त्याबाबतही या बैठकीत महत्वाची चर्चा व निर्णय होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. कर्नाटकचे वस्त्रोद्योग मंत्री श्रीमंत पाटील, अतिरिक्त मुख्य सचिव राकेश सिंग या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
संपादन : अमित गोळवलकर
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.