शेतकरी ट्रॅक्टर घेऊन थेट पोचले लाल किल्ल्यावर

कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर मोर्चाला सुरूवात झाल्यानंतर काही वेळातच हिसंक वळण लागले. या मोर्चाला दिल्लीत येण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी लावलेले बॅरिकेड्स तोडून शेतकरी दिल्लीत घुसले.
Farmers Tractor rally reaches at historical Red Fort
Farmers Tractor rally reaches at historical Red Fort

नवी दिल्ली : शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा राजधानी दिल्लीत घुसला असून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मोर्चातील काही शेतकरी ट्रॅक्टर घेऊन ऐतिहासिक लाल किल्ला परिसरात पोहचले आहेत. हातात तिरंगा ध्वज घेऊन शेतकऱ्यांकडून घोषणाबाजी केली जात आहे. याठिकाणचे आंदोलन शांततेत सुरू असल्याचे दिसून येते. मात्र, दिल्लीत अन्य काही भागात आंदोलक शेतकरी आक्रमक झाले आहेत.

कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर मोर्चाला सुरूवात झाल्यानंतर काही वेळातच हिसंक वळण लागले. या मोर्चाला दिल्लीत येण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी लावलेले बॅरिकेड्स तोडून शेतकरी दिल्लीत घुसले. काही ठिकाणी पोलिसांना बळाचा वापर करावा लागल्याने मोर्चाला हिंसक वळण लागले. पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. शेतकऱ्यांनीही आक्रमक पवित्रा घेतल्याने पोलिसांवरच हल्ला करत त्यांच्या गाड्यांच्या तोडफोड केल्याच्या घटना समोर येत आहेत. यादरम्यान काही शेतकरी ट्रॅक्टर घेऊन लाल किल्ला परिसरात पोहचले आहेत.

प्रजासत्ताक दिनाच्या राजपथावरील संचलनासोबतच शेतकरी संघटनांनी दिल्लीत ट्रॅक्टर मोर्चा काढला आहे. या मोर्चासाठी आधीपासून तयारी करून मार्ग निश्चित करण्यात आले होते. पण मंगळवारी वेगळेच चित्र पाहायला मिळाले. दिल्ली-हरयाणा सीमेवर शेतकऱ्यांनी बॅरिकेड्स तोडत शेतकऱ्यांनी दिल्लीच्या दिशेने कूच केले. त्यामुळे काही ठिकाणी पोलिस व शेतकरी एकमेकांना भिडले. पोलिसांना लाठीचार्ज करावा लागल्याने शेतकऱ्यांनीही आक्रमक पवित्रा घेतला. पोलिसांच्या काही वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या असून काही ठिकाणी पोलिसांना मारहाण झाल्याचे घटनाही समोर आल्या आहेत. 

सिंघु व टिकरी सीमेवर हजारो शेतकरी एकत्रित आले होते. तिथे पोलिसांनी बॅरिकेड्स लावली होती. प्रजासत्ताक दिनाचे संचलन सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांचा मोर्चा सुरू होणार होता. पण सिंघु सीमेवर शेतकरी रिंगरोडवरून मोर्चा नेण्याचा आग्रह करत होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी बॅरिकेड्स तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. टिकरी व चिल्ला सीमेवरही हीच स्थिती आहे. 

आंदोलनकर्ता शेतकरी पोलिसांनी उभारलेले अडथळे तोडून दिल्लीत घुसले आहेत. त्यानंतर शेकडो शेतकरी मुकरबा चौकात बराच वेळ बसून राहिले. पण पुन्हा त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. त्यामुळे पोलिसांनाही बळाचा वापर करावा लागला. काही ठिकाणी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. तर काही भागात लाठीचार्जही करावा लागला. त्यामुळे या मोर्चाला हिसंक वळण लागले. पोलिसांच्या अश्रूधुराच्या बंदुकाही हिसकावण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केल्याचे वृत्त आहे. 

दरम्यान, शेतकरी संघटनांनी तीन कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी आज ट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चामध्ये अनेक शेतकरी हातात तिरंगा ध्वज घेऊन सहभागी झाले आहेत. ट्रॅक्टरलाही ध्वज लावण्यात आले आहेत. काही ठिकाणी फुलांचा वर्षाव करून मोर्चाचे स्वागत करण्यात आले. पोलिसांकडूनही कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शेतकरी संघटनांकडून काही लाख ट्रॅक्टर मोर्चामध्ये सहभागी होतील असे सांगण्यात आले होते. पण दिल्ली पोलिसांनी केवळ पाच हजार ट्रॅक्टरलाच परवानगी दिली आहे. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com